‘१८ एप्रिल २०२५ या दिवशी प्रसिद्ध केलेल्या भागात आपण डॉ. दुर्गेश सामंत यांच्या साधनाप्रवासात त्यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करू लागल्यावर त्यांना स्वतःत जाणवलेले पालट हा भाग पहात आहोत. आज या लेखमालिकेतील उर्वरित भाग येथे दिला आहे.
(भाग ९)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/904199.html

११. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करू लागल्यावर स्वतःत जाणवलेले पालट !
११ ए. माझ्याकडून मनमोकळेपणा, बोलण्यातील चातुर्य, ‘योग्य-अयोग्य काय ?’ हे विचारून घेणे, व्यापक विचार इत्यादी अनेक गुणांच्या वृद्धीसाठी प्रयत्न होऊ लागले.
११ ऐ. लौकिक अर्थाने समजलेल्या गुणांना विकासाची उचित दिशा मिळणे : माझा शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, वैद्यकीय शिक्षणाचा कालखंड आणि नंतर व्यवहार असा प्रवास होत असतांना ‘माझ्यात काही गुण असावेत’, असे मला वाटत असे. तेव्हा माझ्याकडून तसे प्रयत्न होत असत. यातील अनेक प्रयत्न स्वतःकडे आणि स्वतःच्या जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन अन् परिस्थिती यांमध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी होणार्या संघर्षामुळे होत असत; परंतु सनातनच्या संपर्कात आल्यावर त्यांत वाढ झाली आणि त्यांचे मापदंड पालटले. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
११ ऐ १. सनातनमध्ये आल्यानंतर नेतृत्वगुणाला आध्यात्मिकतेचे परिमाण लाभणे आणि स्वार्थी भौतिकवादी विचारांचा प्रभाव अल्प होणे : शालेय जीवनात मी कशाचेही नेतृत्व घ्यायला, म्हणजे पुढाकार घ्यायला घाबरत असे. ‘वादविवाद, स्पर्धा हा आपला प्रांतच नव्हे. आपल्याला ते कधीच जमणार नाही’, अशी माझी भूमिका होती. निबंधलेखन स्पर्धा, कविता स्पर्धा अशा गोष्टींच्या वाट्यालाही मी जात नसे. मी व्यासपिठावरून बोलायला कधीच तयार (सिद्ध) नसे. गल्लीतील क्रिकेट टीममध्येसुद्धा मला ‘प्रमुख पद’ नको असायचे. महाविद्यालयीन जीवनात गेल्यानंतर हे सर्व पालटले. तेव्हा ‘परिस्थतीमुळे आपल्यात ही उणीव आहे’, असे मला वाटले. ‘ती भरून न निघाल्यास आपले कसे होणार ?’, असे मला वाटू लागले. त्यामुळे माझ्याकडून ‘महाविद्यालयीन निवडणुकीच्या राजकारणात सक्रीय भाग घेणे, आंदोलनात भाग घेणे, नंतर पुढे वैद्यकीय शिक्षण घेतांना समवेत असलेल्यांना प्रत्यक्ष शिकवणे’, असे सर्व आरंभ झाले. असे सर्व असले, तरी त्यामागे ‘आपल्यावर त्याचे दायित्व आले आहे किंवा आपल्याला ते पद हवे आहे’; म्हणून मी ते करत होतो. त्यातून ‘आणखी काही शिकायला मिळू शकते आणि ते शिकायला हवे’, ही दृष्टी मला नव्हती. ‘विशेष करून नेतृत्वगुणांची जोपासना करायची असते. ते व्यवस्थित वाढवायचे असतात’, याची मला जाणीव नव्हती. मी सनातनमध्ये आल्यानंतर हे पालटत राहिले. त्याला आध्यात्मिकतेचे परिमाण लाभले. त्यामुळे माझ्यातील स्वार्थी भौतिकवादी विचारांचा प्रभाव अल्प झाला.
११ ऐ २. ‘अन्य माणसे, समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी स्वतः दायित्व स्वीकारून काही करायला हवे’, याची जाणीव विकसित होणे : सनातनच्या संपर्कात येण्याआधी माझा ‘स्वतःचे सुख बाजूला ठेवून काही करणे’, असा विचार अल्प होता. सनातनच्या संपर्कात येण्याआधी मी सामाजिक कार्यात जाणीवपूर्वक सहभागी नव्हतो. सांगलीत वैद्यकीय व्यवसाय चालू केला, तेव्हा सनातनमध्ये येण्याच्या आधी आपण ‘मानसिक स्तरावरील आजार आणि प्रतिबंधात्मक वैद्यक शास्त्र’ यांविषयी थोडा वेळ काढून समाजात जाऊन काही प्रबोधन चालू करावे, म्हणजे सामाजिक जाणीव विकसित होईल’, अशी माझी समजूत होती. तसा मी अल्प प्रयत्न चालूही केला होता. खाजगी व्यवसाय चालू केल्यानंतर ३ मासांतच सनातनशी परिचय झाला आणि मी अध्यात्मप्रसाराच्या कार्याकडे वळलो. सनातनमध्ये आल्यानंतर जे कुणी येतील, त्यांना समवेत घेऊन विविध कार्यक्रम आयोजित करणे, वर्तमानपत्रांशी संपर्क करणे, निधी एकत्र करणे, विविध प्रकारच्या मोहिमा किंवा उपक्रम राबवणे, यांत स्वतःच्या सुखाचा विचार बाजूला होऊन मग माझा खर्या अर्थाने थोडे शिकण्यास आरंभ झाला.
सूक्ष्मातून समजणे, म्हणजेच १०० टक्के सात्त्विक बुद्धीने समजणे
संस्थेत प्रारंभी अनेक जिल्ह्यांमध्ये कठीण परिस्थिती होती. जिल्ह्यातील प्रसारकार्य; तेथील विविध प्रकारचे व्यवस्थापन, म्हणजे ग्रंथ, प्रसार साहित्य, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आणि अर्पण यांचे व्यवस्थापन आणि त्यांचे अहवाल इत्यादी गोष्टी साधकांना जमत नसत. जिल्ह्याचे दायित्व असलेल्या साधकाला ते सर्व येणे आवश्यक असे; परंतु अनेक जणांना ते जमत नसे; म्हणून पुनःपुन्हा जिल्हाप्रमुख पालटला जायचा. त्या वेळी मी प.पू.डॉक्टरांना विचारले, ‘‘जिल्ह्यांतील साधकांमधून योग्य नेतृत्व करणारा साधक कसा ओळखायचा?’’ त्यावर प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘सूक्ष्मातून.’’
एकदा चर्चेमध्ये मी प.पू. डॉक्टरांना प्रश्न विचारला, ‘‘सूक्ष्मातून उत्तर काढणे आणि बुद्धीने उत्तर काढणे’, यांमध्ये काय भेद आहे ? कारण बुद्धीने योग्य उत्तर यायला हवे किंवा सूक्ष्मातून जे उत्तर येते, तसेच उत्तर बुद्धीने येईल, यासाठी कसे असायला हवे ?’’ त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘सूक्ष्मातील उत्तर आणि शंभर टक्के सात्त्विक असलेल्या बुद्धीचे उत्तर हे एक असते.’’ थोडक्यात आपली बुद्धी १०० टक्के सात्त्विक झाली की, येणारी उत्तरे बुद्धीने आली असली, तरी ती सूक्ष्मातून आल्याप्रमाणेच असतात.’
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२४)
११ ऐ ३. व्यवस्थापन आणि प्रशासन शिकणे : मी पूर्वी एखाद्या कार्याची योग्य कालबद्ध श्रमविभागणी करून ते कार्य पूर्णत्वाला नेणे, अशा गोष्टींचे दायित्व घेत नसे; कारण या गोष्टी माझ्यामध्ये फारशा नव्हत्या. त्यामुळे अगदी दिवाळीचा आकाशकंदिल बनवणे, दिवाळीचा किल्ला करणे, यांपासून ते शाळेमध्ये एखादे प्रदर्शन लावणे, यांत जे करणारे आहेत, त्यांच्या हाताखाली मी काम करत असे; पण नियोजन कधीच करत नसे. ‘सांगितले तेवढेच करायचे’, अशा भूमिकेतच मी असे. वैद्यकीय शिक्षण आणि त्यानंतर व्यवसाय करत असतांनाही मी केवळ आपल्या पुरते जेवढे आहे, तेवढ्याचाच विचार करू शकत असे.
‘सनातन संस्थे’मध्ये आल्यानंतर विविध उपक्रमांचे दायित्व आल्यामुळे ‘कालबद्ध श्रमविभागणी कशी करायची ?’, हे मला शिकायला मिळाले. प्रशासकीय कुशलता म्हणजे ‘कोणत्या धोरणाने पुढे जावे ? कोणत्या प्रकारे कृती केल्या, तर कोणते फळ मिळेल ? अधिकाधिक स्वयंशिस्त असलेली आणि अल्पतम नियंत्रण असलेली यंत्रणा सिद्ध व्हावी’, या विषयांचा थोडा विचार केवळ सनातनमध्ये आल्यामुळे होऊ शकला.
११ ऐ ४. सनातन संस्थेमध्ये आल्यानंतर ‘आपल्यात प्रेमभाव अल्प आहे’, याची जाणीव होणे : शालेय जीवनात आणि त्यानंतर महाविद्यालयीन जीवनात ‘आपण आपल्या पायावर उभे रहाणे’, हेच प्रथम कर्तव्य वाटत होते. वैद्यकीय शाखेकडे आल्यानंतर इतरांना साहाय्य करणे अधिक प्रमाणात होऊ लागले; पण हे साहाय्य ‘मी डॉक्टर आणि समोरचा रुग्ण’ या भूमिकेतूनच असे. त्यामुळे मला जीवनाचे इतर पैलू कळत नसत आणि समोरचा माणूस ‘खर्या अर्थाने आपला वाटणे’, हा भाग फार दूर होता. सनातनमध्ये प.पू. डॉक्टरांच्या सान्निध्यात आल्यानंतर जे काही दायित्व सांभाळावे लागले, त्यामध्ये स्वतःतील ही उणीव किंवा दोष लक्षात आला आणि मग तो दूर करण्याची थोडी प्रक्रिया चालू झाली. यात महत्त्वाची उणीव होती, ती म्हणजे ‘प्रेमभावाची !’ ‘माझ्यात ही उणीव आहे’, याची मला जाणीवही नव्हती.
११ ऐ ५. उत्तर भारतात प्रसारकार्यासाठी जाऊ लागल्यानंतर ‘हा देश आपला आहे’, अशी आंतरिक जाणीव दृढ होणे आणि ‘ही माती, या नद्या, ही माणसे आपली आहेत’, या जाणिवेचा विकास होऊ लागणे : मी उत्तर भारतात प्रसार कार्यासाठी भ्रमंती करण्याआधी माझी महाराष्ट्र किंवा फार तर गोवा येथपर्यंतच प्रादेशिक जाणीव विकसित होती. अन्य ठिकाणच्या व्यक्ती आणि मी यांच्यात एक प्रकारचा अंतर्यामी दुरावा होता. भाषा, बोलणे आणि वरकरणी संस्कृतीतील थोडाफार भेद, अशी विविध कारणे त्यामध्ये असू शकतात. उत्तर भारतात प्रसारकार्यासाठी जाऊ लागल्यानंतर यांत हळूहळू परिवर्तन होत गेले आणि मग ‘हा देश आपला आहे’, अशी आंतरिक जाणीव दृढ झाली. ‘ही माती, या नद्या आणि ही माणसे आपली आहेत’, या जाणिवेचा विकास होण्यास आरंभ झाला. विदेशी साधक आश्रमात येऊ लागल्यानंतर आरंभी असेच झाले; परंतु ‘ते साधक आहेत’, हे पहाण्याची दृष्टी असल्यामुळे त्यांची व्यापकता आणि प्रयत्न पाहून ‘तेसुद्धा आपले आहेत’, हे वाटण्याची प्रक्रिया चालू झाली.
११ ऐ ६. ‘सनातन प्रभात’साठीच्या लिखाणाचे दायित्व मिळाल्यामुळे स्वतःचे चिंतन चालू होणे, चिंतन चालू झाल्यामुळे लिखाण चालू होणे, त्यामुळे विचार स्पष्ट होऊन लिखाण सुधारणे : सर्वसामान्य हिंदूंना जेवढी हिंदुत्वाची जाणीव असते, त्याहून थोडी अल्पच जाणीव माझ्यामध्ये होती. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यानंतर ‘साप्ताहिकासाठी लेख लिहायला हवेत’, असे मला वाटले आणि कोणत्या विषयावर लेख लिहावेत ?’, असे चिंतन चालू झाले. मी सर्वांत पहिला विषय निवडला, तो म्हणजे ‘हिंदूंचे काश्मीरातून पलायन !’ तो लेख लिहून मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू होण्यापूर्वीच प.पू. डॉक्टरांना दाखवला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘लेख ठीक आहे; पण तूर्त आपण तो प्रकाशित करू शकत नाही. नंतर बघू.’’ मग तो लेख बाजूला पडला; परंतु मुळात लिखाणाचे दायित्व मिळाल्यामुळे माझे चिंतन चालू झाले आणि चिंतन चालू झाल्यामुळे लिखाण चालू झाले. लिखाण केल्यामुळे विचार स्पष्ट झाले. विचार स्पष्ट झाल्यामुळे लिखाण सुधारले. हे सर्व लिखाण प.पू. डॉक्टरांच्या दृष्टीखालून जात असल्यामुळे ‘आपले कुठे चुकते ? कसे असायला हवे ? कसे असू नये ?’, याची सुस्पष्टता होत राहिली. ‘पूर्वी वाचलेले थोडे थोडे कसे उपयोगात आणायचे ?’, हेही लक्षात येऊ लागले.
११ ऐ ७. सर्वसामान्य हिंदूपेक्षाही अल्प असलेली हिंदुत्वाची जाणीव वृद्धींगत होणे : ‘घटना आणि त्याचा निष्कर्ष यांचा संबंध कसा असतो ? कोणत्या घटनेतून कोणते निष्कर्ष कसे निघतात ?’, हे मला शिकायला मिळाले. मला या सर्वांचा उपयोग ‘हिंदुत्व म्हणजे काय ?’ याचे चिंतन होण्यासाठी झाला. प्रत्यक्ष लोकांशी बोलायला मिळाल्यामुळे ‘आणखी कशा रीतीने प्रयत्न करायला हवेत?’, हे मला शिकायला मिळाले. त्यामुळे मला ‘नेमके कोणते वाचन करावे ?’ हे स्पष्ट झाले. माझे वाचन झाल्यामुळे माझ्यात आणखी पालट झाला. सर्वसामान्य हिंदूपेक्षाही अल्प असलेली माझी हिंदुत्वाची जाणीव आता सुधारली. यांत प.पू. डॉक्टरांनी एकदा सांगितलेले ‘हिंदूंना धर्मशिक्षण नाही. त्यांच्याकडून धर्माचरण नीट होत नाही,’ हे सूत्र मनी ठसले. ही प्रक्रिया चालू राहून आता ती ‘अद्वैत दर्शना’विषयी अध्ययन करण्यापर्यंत पोचली.’
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२४)
(समाप्त)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |