
कोल्हापूर – उंचगाव पुलाखालून जाणारा रस्ता हुपरी-पट्टणकोडोली, तसेच कर्नाटकात जात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक पुलाखालून होते. या पुलाच्या खाली गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावरती येऊन मोठी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सतत होते. याच समवेत राज्य महामार्गावर चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी गांधीनगर नळपाणी योजनेची वाहिनी होती. त्यावर १४ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तरी उंचगाव येथील राज्य महामार्गाखाली चालू असलेल्या कामामुळे गांधीनगर नळपाणी योजनेला अडथळे येऊ नये यांसाठी काळजी घ्यावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अभियंता महेश पाटोळे यांना निवेदन देण्यात आले.
महेश पाटोळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विभागाने ही वाहिनी भूमीच्या खालून घेतल्यास वाहतुकीची कोंडी अल्प होईल. त्यामुळे या संदर्भातील योग्य त्या सूचना ठेकेदारास देण्यात याव्यात. या प्रसंगी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, पोपट दांगट, राहुल गिरूले, दत्ता फराकटे, कैलास जाधव, सचिन नागटिळक, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे संस्थापक शरद माळी, यांसह अन्य उपस्थित होते.