‘आपण येता-जाता नकळत एखादा शब्द किंवा वाक्य कुणाच्या तरी तोंडून ऐकतो. कधी कुणाच्या भ्रमणभाषची ‘रिंगटोन’ वाजते आणि विचारात अडकलेले आपले मन देव भानावर आणतो अन् त्यातून अंतर्मुख करून अनुसंधानात घेऊन जातो. एकदा एका साधिकेचे ‘प.पू. गुरुदेवांची सौंदर्यदृष्टी’, हे शब्द माझ्या कानावर पडले आणि माझे मन ‘श्री गुरूंची सौंदर्यदृष्टी साधकजीव कशी अनुभवत असतो ?’, याचे चिंतन करू लागले. तेव्हा मला पुष्कळ आनंद मिळू लागला आणि गुरुदेवांनी विविध सूत्रे सुचवली. त्यातील काही सूत्रे विचारांच्या रूपात, तर काही सूत्रे कवितेच्या रूपात होती.

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्वरच आहेत’, याची साधिकेला आलेली प्रचीती !
गुरुदेवांनीच साधकांना एखाद्या गोष्टीमध्ये दडलेले सौंदर्य टिपायला सुचवले. ईश्वरानेच सर्व निर्माण केले असल्याने प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे सौंदर्य प्राप्त झाले आहे. सजीव-निर्जीव सर्वच घटकांमध्ये सौंदर्य आहे. ज्याने ते घटक निर्माण केले, तोच ‘त्यात काय सौंदर्य आहे ?’, हे इतरांना दाखवू शकतो. प.पू. डॉक्टर, ज्या अर्थी हे तुम्ही आम्हाला दाखवता, वेगवेगळ्या प्रकारे ते उलगडता, त्यातूनच सिद्ध होते की, ‘तुम्ही ‘ईश्वर’ आहात.’
२. सृष्टीतील विविध घटकांतील सौंदर्यस्थळे
परम पूज्यांनी वेगवेगळ्या घटकांतील सौंदर्याची काही उदाहरणे सांगितली. जसे बीजाचे सौंदर्य म्हणजे त्याची नवनिर्मितीची क्षमता, झाडाच्या पानांचे सौंदर्य म्हणजे त्यांचा आकार, फुलांचे सौंदर्य म्हणजे त्यांचा सुगंध, आकार आणि रचना, तसेच फळांचे सौंदर्य म्हणजे त्यांचे रसमाधुर्य, पाण्याचे सौंदर्य म्हणजे त्याची निर्मळता, पवित्रता, आकाशाचे सौंदर्य म्हणजे त्याची विशालता, भूमातेचे सौंदर्य म्हणजे तिची वत्सलता, सूर्याचे सौंदर्य म्हणजे त्याचे तेज, चंद्राचे सौंदर्य म्हणजे त्याची शीतलता, यांप्रमाणे आपण प्रत्येक घटकामधील सौंदर्य पाहू शकतो.
३. सौंदर्य
भक्तीयोग्याचे सौंदर्य म्हणजे त्याचा भाव, ज्ञानयोग्याचे सौंदर्य म्हणजे त्याची जिज्ञासा, कर्मयोग्याचे सौंदर्य म्हणजे त्याची कार्यमग्नता आणि कार्यातील परिपूर्णता, योद्ध्याचे सौंदर्य म्हणजे त्याची युद्धनिपुणता आहे.
४. गुरुदेवांनी साधकजिवांना सौंदर्यदृष्टी प्रदान केली असल्याने ते साधकांच्या जीवनाचे शिल्पकार असणे
अशा प्रकारे प्रत्येक साधक आणि व्यक्ती यांचे आपण निरीक्षण केले, तर भगवंताने प्रत्येकाला दिलेले सौंदर्य आपल्या दृष्टीस पडेल. गुरुदेवांनी सनातनशी जोडलेल्या प्रत्येक जिवाला ही सौंदर्यदृष्टी प्रदान केली आहे. ‘प.पू. डॉक्टरांची सौंदर्यदृष्टी’, असा शब्दप्रयोग करतांना प्रत्येकात सौंदर्यदृष्टीची निर्मिती करणारे असे ते आम्हा सर्वांच्या जीवनाचे शिल्पकार आहेत’, असे लक्षात येते.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अलौकिक सौंदर्यदृष्टी ।
ज्यांनी निर्मिली अनुपम सृष्टी ।
अशा माझ्या गुरुदेवांची आहे ।
‘अलौकिक सौंदर्यदृष्टी’ ।। १ ।।
दाविती ते आम्हा आणि पहावया शिकवती नानाविध गोष्टी ।
कधी ढगात विविध आकृती ।
कधी पालटते विविध रंग प्रकृती ।
कधी झाडांमध्ये, कधी फुलांमध्ये ।
कधी निर्जीव दगडांमध्ये ।। २ ।।
नानाविध गोष्टी दाविती ।
निसर्ग जणू घेतसे या सर्वांसाठी त्यांचीच अनुमती ।
कारण साधकजीवा आनंद देण्या सदा कार्यरत गुरुदेवांची प्रीती ।। ३ ।।
कधी दिसती इंद्रधनूचे विविध रंग ।
साधकमन होई पहाण्यात दंग ।
आणि विचार येई, माझिया जीवनी ऐसेच केले गुरुदेव ।
आता सेवा घडावी त्यांच्या चरणांची मनोभावे ।। ४ ।।
कधी चंद्र, सूर्य, तार्यांचे मनोहर दर्शन घडवती ।
पहा, यांच्यातही पालट होतसे । (टीप १)
म्हणती नित्य पालट हा असे निसर्ग धर्म ।
सांगती यातून ते जीवनाचे मर्म ।। ५ ।।
कधी दिवसा उजेडी । कधी रात्रीच्या अंधारी ।
साधका शिकवण्या सदैव तत्पर गुरुदेव ।। ६ ।।
रूपे श्रीकृष्ण मुरारी ।
महायुद्धसमयी रणसंग्रामी पार्था ज्ञान देता ।
गोपगोपींचा जमवूनी मेळा बाललीला करता ।
हळूच सारी माया त्यागून निघूनही जाता । (टीप २)
तरीही सदैव सूक्ष्मरूपे भक्ताजवळी असता ।। ७ ।।
उद्धवाला धाडूनी वृंदावनी गर्वही हरता ।
कधी नकळत घडते काही असे दावूनी । (टीप ३)
शापित जिवा उद्धरिता ।। ८ ।।
अपराध्यास तुम्ही शिक्षा देता । (टीप ४)
अगम्य लीला तुमची देवा ।
तुम्ही हो मोक्षदाता ।। ९ ।।
टीप १ : कधी चंद्राला, तर कधी सूर्याला ग्रहण लागते. तारा तुटतो, म्हणजे काहीतरी अल्प होते. आपले प्रयत्न अल्प झाले, स्थिती चांगली नसते, तेव्हा आपल्याला ते स्वीकारता येत नाही. तेव्हा आपल्याला उभारी िमळण्यासाठी ‘असे होणे कुणाला चुकले नाही’, हे परम पूज्य शिकवत होते.
टीप २ : गोपगोपींना सोडून श्रीकृष्ण द्वारकेला आले.
टीप ३ : यशोदामैय्याने उखळीला बांधलेले श्रीहरि ते उखळ ओढत २ भव्य वृक्षांच्या मध्ये अडकतात. तेव्हा ते वृक्ष उन्मळून पडून त्यातून शापित जीव मुक्त झाले. अशा बर्याच लीला भगवंताने ‘मी काही केले नाही’, अशा भावात राहून केल्या.
टीप ४ : शिशुपाल, कंस, रावण यांसारख्या शत्रूंचा भगवंताने वध केला, म्हणजे त्यांचा उद्धारच केला आहे. ती भगवंताची लीला आहे.’
– सौ. स्वाती संदीप शिंदे (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |