योजनांच्या माहितीसाठी मोबाईल ॲप विकसित करणार !

मुंबई – अपघातग्रस्त रुग्णांना वेळेवर दर्जेदार, तसेच कॅशलेस (रोख रक्कम न घेता) उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालये, सोसायटीचे अधिकारी आणि अंमलबजावणी संस्था यांनी कठोर दक्षता बाळगावी. यात अपप्रकार करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अपघातग्रस्त रुग्णांसाठी १ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आरोग्य विभागाच्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला. ‘१ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत आणि अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी’, असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी, मुंबई येथील मुख्यालयात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना’ यांच्या कामकाजाचा आढावा आरोग्यमंत्र्यांनी घेतला.
‘जनतेला योजनेतील रुग्णालयांची माहिती मिळावी, रुग्णालयातील खाटांची उपलब्धता कळावी आणि तक्रारी प्रविष्ट करता याव्यात, यांसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्यात येईल’, असा निर्णयही या वेळी घेण्यात आला.