Tamil Nadu Melts Donated Temple Gold : तमिळनाडू सरकारने राज्यातील २१ मंदिरांमध्ये अर्पण केलेले १ सहस्र किलो सोने वितळवून बँकेत ठेवले !

सोन्यावर मिळत आहे व्याज

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूतील द्रमुक सरकारने सांगितले की, राज्यातील २१ मंदिरांमध्ये भाविकांनी अर्पण केलेले १ सहस्र किलोपेक्षा अधिक सोने वितळवून २४ कॅरेट सोन्याच्या विटांमध्ये रूपांतरित करून बँकांमध्ये जमा करण्यात आले आहे. या गुंतवणुकीतून सरकारला प्रतिवर्ष सुमारे १७ कोटी ८१ लाख रुपये व्याज स्वरूपात मिळत आहेत.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे सर्व सोने मुंबईतील सरकारी टांकसाळीत वितळवले गेले आणि नंतर ‘गोल्ड इन्व्हेस्टमेंट स्कीम’ अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा केले गेले. या योजनेवर देखरेख ठेवण्यासाठी राज्यातील ३ क्षेत्रांमध्ये निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली ३ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, ज्या सोने वितळवण्याच्या आणि गुंतवण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवत आहेत.

चांदीच्या संदर्भातही अशीच योजना राबवणार  

सोन्यानंतर आता राज्य सरकारने मंदिरांमधील वापरात नसलेल्या चांदीच्या वस्तू अशाच प्रकारे वितळवून त्यांचे शुद्ध चांदीच्या विटांमध्ये रूपांतर करण्याची योजना आखत असल्याची माहिती दिली आहे. यासाठी सरकारने मान्यता दिलेल्या चांदी वितळवणार्‍या खासगी आस्थापनांचे साहाय्य घेतले जात आहे.

मंदिरांच्या मालमत्तेचे रक्षण आणि विकास यांसाठी योजना असल्याचा दावा

हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागाने विधानसभेत सादर केलेल्या धोरणात्मक निवेदनात म्हटले आहे की, ही योजना केवळ मंदिरांना आर्थिक लाभ देत नाही, तर भक्तांनी दिलेल्या दानांचा योग्य वापर देखील सुनिश्चित करत आहे. मंदिरांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी वापर करण्याच्या दृष्टीने हे पाऊल एक अर्थपूर्ण पाऊल मानले जात आहे.

संपादकीय भूमिका

तमिळनाडूमध्ये सत्तेत असलेल्या द्रमुक सरकारचे उपमुख्यमंत्री आणि अन्य नेते सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया यांच्याशी करतात. अशांना हिंदूंच्या मंदिरातील अर्पण केलेल्या सोन्याला हात लावण्याचा काय अधिकार ? तमिळनाडूतील हिंदूंना द्रमुक सरकारला जाब विचारणे आवश्यक !