मंदिर परिसरात ‘सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह’ नावाने ट्रस्ट चालू केल्याने वाद

अहिल्यानगर – श्री संत शेख महंमद शेख महाराज हे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याच काळातील एक संत होते. मुसलमान कुटुंबात जन्माला आले असले तरी संत शेख महंमद यांनी भागवत धर्म स्वीकारला. इतकेच नव्हे, तर त्यांनी भागवत धर्माचा प्रचार-प्रसारही केला. श्रीगोंदा शहरात त्यांची संजीवन समाधी आहे; मात्र ‘या समाधीच्या ठिकाणी मंदिर उभे रहावे’, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे, तर दुसरीकडे शेख महाराज यांचे वंशज अमीन शेख यांनी मंदिर परिसरात ‘सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह’ नावाने ट्रस्ट चालू केला आहे. त्यामुळे वाद चालू झाला असून येथील ग्रामस्थांनी १७ एप्रिल या दिवशी आंदोलन चालू केले आहे. या वेळी ह.भ.प. बंडा तात्या कराडकर महाराजांनीही यात सहभाग घेतला होता. या वेळी ‘सौगंध महंमद की खाते है, मंदिर यही बनायेंगे’, अशी घोषणा देत ह.भ.प. बंडा तात्या कराडकर महाराजांनी ‘अहिल्यानगरमधील श्रीगोंदा येथील मंदिराचा जीर्णोद्धार लवकरात लवकर करावा, तसेच शासनाने कुठलाही विलंब न करता चुकीचा ट्रस्ट रहित करावा’, अशा मागण्या या वेळी केल्या आहे. या मागणीसाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या आंदोलनाच्या वेळी बोलतांना ह.भ.प. बंडा तात्या कराडकर महाराज म्हणाले, ‘‘सध्या श्रीगोंद्यात संत श्री शेख महाराजांचा समाधी उत्सव साजरा केला जातो, त्याठिकाणी कुणीही आपल्या समाजात विष कालवू नये. बासुंदी करण्यासाठी अनेक वस्तू लागतात; मात्र ती बासुंदी खराब करण्यासाठी अमीन शेख सारखा एखादा खडा असतो, तसेच हा खडा बाजूला करणे आवश्यक आहे.’’