‘पितांबरी उद्योग समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा नागरी सत्कार !

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा मानपत्र देऊन नागरी सत्कार करतांना मान्यवर

ठाणे, १७ एप्रिल (वार्ता.) – अल्प कालावधीत उद्योगक्षेत्रात भरीव कामगिरी करणारे, शेकडो मराठी युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारे आणि उद्योगक्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी मराठी युवकांना प्रोत्साहित करणारे ‘पितांबरी उद्योग समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा जाहीर ‘नागरी सत्कार’ करण्यात आला. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे, ‘चितळे बंधू’चे प्रमुख श्री. श्रीकृष्ण चितळे, भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते. १७ एप्रिल या दिवशी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘नागरी अभिवादन सत्कार समिती’ने या सोहळ्याचे आयोजन केले होते.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून डॉ. प्रभुदेसाई यांचा गौरव !

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘डॉक्टरेट’ प्राप्त झाल्याविषयी पाठवलेल्या संदेशाचे व्यासपिठावरून वाचन करण्यात आले. उद्योगक्षेत्रातील नेत्रदीपक कर्तृत्व आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदान यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा गौरव केला.

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या नागरी सन्मान सोहळ्याचा सविस्तर वृत्तांत…

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

नृत्याद्वारे श्री गणेशवंदना करून सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर नागरी अभिवादन सत्कार समितीच्या वतीने व्यासपिठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर श्री. संजय ढवळीकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या कार्याचा आढावा दिला. डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचे उद्योग, सामाजिक, अध्यात्म अशा विविध कार्यांतील भरीव योगदानाची माहिती देणारा व्हिडिओ दाखवण्यात आला.

स्मरणिकेचे प्रकाशन !

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या वाटचालाची सविस्तर माहिती असलेल्या स्मरणिकेचे या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेमध्ये डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या विविध क्षेत्रांतील योगदानाची माहिती आहे, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे लेख आहेत.

प्रभुदेसाई यांच्या खडतर परिश्रमातून यश साध्य ! – श्रीकृष्ण चितळे

श्रीकृष्ण चितळे

रवींद्र प्रभुदेसाई यांच्या उदाहरणातून व्यवसाय आणि अध्यात्म वेगळे नाही, हे लक्षात येते. त्यांची ही घोडदौड त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. प्रभुदेसाई हे भविष्यातही व्यवसायात पुष्कळ प्रगती करतील. त्यांनी खडतर परिश्रम घेतल्यानेच हे यश साध्य झाले आहे.

‘मी देशासाठी काय करीन’ या विचाराने डॉ. रवींद्र प्रभुदेसाई उद्योगक्षेत्रात कार्यरत ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

डॉ. सच्चिदानंद शेवडे

समाज, राष्ट्र यांसाठी योगदान देणारे आणि अध्यात्माची आवड असलेले डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे. ‘मी देशाचा आणि देश माझा. माझ्या देशासाठी अधिकाधिक काय करता येईल ?’, या विचारांतून रवींद्र प्रभुदेसाई यांनी कार्य केले. डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी उद्योगक्षेत्रात प्रगती करतांना अनेक सामाजिक, धार्मिक क्षेत्रांत कार्य करणार्‍या संस्थांना साहाय्य केले. त्यांच्या ‘पितांबरी’ या पहिल्या उत्पादनाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हे त्यांच्या उद्योगाला हुरूप वाढवणारे ठरले. मागील ३६ वर्षांत हे यश सहज मिळालेले नाही. यासाठी त्यांनी पुष्कळ कष्ट घेतले आहेत. व्यवसाय सांभाळून त्यांनी सामाजिक कार्यात योगदान दिले. यासाठी त्यांनी त्यांचे सक्षम सहकारी सिद्ध केले. स्वत:च्या कार्यालयात त्यांनी वाचनालय सिद्ध केले आणि सर्वांना वाचनाची आवड निर्माण करण्याला प्रोत्साहन दिले. त्यांचे हे कार्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे.

डॉ. प्रभुदेसाई यांना प्राप्त पुरस्कार हे ठाणे शहराचे वैभव ! – आमदार संजय केळकर

डावीकडून आमदार संजय केळकर

काही वेळा शहरामुळे व्यक्ती, तर काही वेळा व्यक्तींमुळे शहर मोठे होते. ठाणे शहराला मोठे करणार्‍या अशा काही व्यक्तींपैकी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई हे एक आहेत. राजकारणात काम करतांना मी अनेक उद्योजक पाहिले, त्यामध्ये सचोटीने काम करणारे मोजके उद्योजक पाहिले. त्यामधील डॉ. रवींद्र प्रभुदेसाई हे एक आहेत. त्यांच्यामध्ये व्यवस्थापन, शिस्त हे गुण आहेत. त्यांचे वडील प्रचंड कष्ट करणारे व्यक्तीमत्त्व होते. डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले. त्यांच्या कार्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा पगडा आहे. निष्ठा आणि संस्कार हे त्यांच्या वडिलांमधील गुण रवींद्र प्रभुदेसाई यांच्यामध्ये पहायला मिळतात. यशस्वी व्यक्तीमध्ये अहंकारमुक्त नम्रता दुर्मिळ दिसते; मात्र ती रवींद्र प्रभुदेसाई यांच्यात पहायला मिळते. अनेक उद्योजक त्रासलेले दिसतात; परंतु रवींद्र प्रभुदेसाई हे नेहमी प्रसन्नमुख असतात. त्यांच्यातील आध्यात्मिक विचारांच्या बैठकीमुळे हे शक्य आहे. त्यांना प्राप्त झालेली ‘डॉक्टरेट’ म्हणजे सर्व ठाणेकरांचा पुरस्कार आहे.

प्रभुदेसाई यांचा सन्मान हा ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा ! – डॉ. अनिल काकोडकर

डॉ. अनिल काकोडकर

अध्यात्म आणि उद्योग यांत विरोधाभास नाही. सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र असाव्यात. प्रभुदेसाई यांचा नाविन्यपूर्ण उद्योजकतेचा कौतुकास्पद प्रवास आहे. जागतिक स्तरावर मराठी उद्योजकाने नाविन्यपूर्ण उत्पादने निर्माण करावीत, ही ठाणेकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यांचा सन्मान हा ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. उद्योगात नाविन्यपूर्णता ही काळाची आवश्यकता आहे. त्यांचे हे यश उत्तरोत्तर वाढत जावो !

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी समाजाला केवळ आर्थिक नव्हे, तर वैचारिक धनही दिले ! – आमदार निरंजन डावखरे

आमदार निरंजन डावखरे

रवींद्र प्रभुदेसाई यांचे वडील वामनराव प्रभुदेसाई यांनी उद्योगक्षेत्राचा पाया रचला आणि रवींद्र प्रभुदेसाई यांनी त्यावर कळस चढवला. समाजातील प्रत्येक घटकाला साहाय्य करण्याचा ते प्रयत्न करतात.

केवळ आर्थिक नव्हे, तर वैचारिक धनही त्यांनी समाजाला दिले आहे. रवींद्र प्रभुदेसाई यांचे पुत्र परीक्षित हे पितांबरी समूहाचे कार्य यशस्वीपणे पुढे नेत आहेत.

प्रभुदेसाई दांपत्याचा सत्कार !

श्रीकृष्ण चितळे यांनी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांना पुणेरी पगडी घातली. डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी शाल दिली. डॉ. अनिल काकोडकर यांनी चांदीची भांडी भेट दिली, तर पितांबरी उद्योग समूहातील सर्व सहकार्‍यांनी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांना मानपत्र प्रदान केले. डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या धर्मपत्नी सौ. वृषाली यांची सौ. कीर्ती आगाशे आणि सौ. मेघा मेहेंदळे यांनी व्यासपिठावर ओटी भरली. सत्कारापूर्वी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांची पत्नी सौ. वृषाली यांच्यावर वेदमंत्रपठणाच्या वेळी सुवासिनींनी पुष्पवृष्टी केली. वरिष्ठ पत्रकार श्री. सुधीर जोगळेकर यांनी मानपत्राचे शब्दांकन केले. सौ. अरूंधती भालेराव यांनी मानपत्राचे वाचन केले. या वेळी पितांबरी उद्योगसमूहाच्या वार्षिक दैनंदिनीचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्याने उद्योगक्षेत्रात यशप्राप्ती ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आमच्या घराजवळ गावदेवीच्या मैदानामध्ये सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती याविषयी मार्गदर्शन होते. या मार्गदर्शनामध्ये ऐहिक आणि आध्यात्मिक अडचणी सुटण्यासाठी साधना का आवश्यक आहे, हे त्यांनी सांगितले. यासह कलेतून साधना कशी होऊ शकते, याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी मी त्यांना ‘उद्योजकता ही कला होऊ शकते का ?’, असे विचारले. त्यावर त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून मला उद्योगक्षेत्रात यश प्राप्त झाले. गुरुकृपायोगानुसार साधना केल्यामुळे माझ्या जीवनात अनेक पालट झाले. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार केलेली साधना ही पितांबरीच्या व्यावसायिक वृद्धीसाठी साहाय्यभूत ठरली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार कुडाळ, मालवण, रत्नागिरी येथील उद्योजकांना उद्योगक्षेत्रातील साधनेच्या महत्त्वाविषयी मार्गदर्शन घेतले.

सद्गुरु सत्यवान कदम

यासाठी सनातन संस्थेचे सद्गुरु सत्यवान कदम यांचे मार्गदर्शन लाभले. मला प्राप्त झालेली ‘डॉक्टरेट’ पदवी ही मी सनातन संस्था आणि मला सहकार्य करणार्‍या संस्थांना अर्पण केली आहे.

सोहळ्याची सांगता पसायदानाने करण्यात आली. प्राजक्ता आगाशे यांनी पसायदान म्हटले. सोहळा झाल्यावर विविध संस्था, संघटना आणि अनेकांनी वैयक्तिकरित्या डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा सत्कार केला.