साधना करू लागल्यावर आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांना स्वतःत जाणवलेले पालट

१७ एप्रिल २०२५ या दिवशी प्रसिद्ध केलेल्या भागात आपण प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. दुर्गेश सामंत यांचा साधनेचा पाया भक्कम केला आणि ते साधनेत टिकून रहाण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी केलेले विविध प्रयत्न याविषयी पाहिले. आता आपण डॉ. दुर्गेश सामंत यांना सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करू लागल्यावर त्यांना स्वतःत जाणवलेले पालट पाहूया.                               

(भाग ८)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/903801.html

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

११. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करू लागल्यावर स्वतःत जाणवलेले पालट !

११ अ. सनातन संस्थेमध्ये येण्याआधी आणि त्यानंतर ‘गुण अन् स्वभावदोष’ या संज्ञांच्या झालेल्या आकलनामध्ये पुष्कळ अंतर असणे : सनातन संस्थेत आल्यानंतर ‘माझ्यात नेमके काय पालट झाले ?’ हे मला स्वतःला सांगणे फार कठीण आहे, तरी मी प्रयत्न करतो. ‘गुण अन् स्वभावदोष’ या संज्ञांचे सनातनमध्ये येण्याआधी आणि सनातनमध्ये आल्यानंतर मला जे आकलन झाले, त्यांत पुष्कळ अंतर आहे. हा सर्वांत महत्त्वाचा पालट आहे’, असे मला वाटते, उदा. ‘अहं’ या शब्दाचा ‘सनातनमध्ये येण्यापूर्वी वाटत असलेल्या अर्थापेक्षा सनातनमध्ये आल्यानंतर लक्षात येत असलेला आध्यात्मिक स्तरावरील अर्थ किती गहन आहे !’, हे अजूनही मला उलगडत (उमजत) आहे. या उदाहरणावरून दोषनिवारण आणि गुणसंवर्धन समजण्यापासूनच अडचण चालू होते. मग ते पालट घडणे आणि घडलेले समजणे, त्याहून कठीण जाते.

११ आ. ‘अहंचे पैलू आणि स्वभावदोष’ यांमध्ये पालट करण्याचा प्रयत्न होणे; परंतु त्यातून अत्यल्प साध्य झाले असल्याची जाणीव असणे : स्वतःमधील पालट या सूत्रांतर्गत दोषांचा विचार करतांना पूर्वी मला ‘माझ्यातील ‘अहंचे पैलू आणि स्वभावदोष यांच्या विविधतेविषयी माहिती होणे आणि मग त्यांच्यामध्ये पालट करण्याचा प्रयत्न होणे’, याची जाणीव अल्प होती. सनातनच्या संपर्कात येण्याआधी माझ्याकडून व्यावहारिक परिस्थितीमुळे काहींवर मात करून त्याच्या उलट असणारे गुण आणण्याचे प्रयत्न झाले. अर्थात् मी हे प्रयत्न ‘व्यावहारिक परिस्थिती अनुकूल असावी’, यासाठी केले असल्याने ते मर्यादित स्वरूपाचे होते. मात्र सनातनच्या संपर्कात आल्यावर समजले की, ‘जे आपण साध्य केले आहे’, असे वाटते, ते अत्यल्प होते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

११ आ १. अपेक्षा : व्यवहारात असतांना ‘मला दुसर्‍यांकडून असणार्‍या अपेक्षा योग्यच आहेत’, अशी माझी धारणा बलवान होती. व्यवहारात काही ठिकाणी माझी हानी होणार असल्याने माझ्याकडून नाईलाजास्तव तडजोड केली जात असे, तरीही मनात प्रतिक्रिया येतच असे. सनातनमध्ये आल्यावर ‘अपेक्षा’ हा अहंचा पैलू अधिक स्पष्ट झाला.

११ आ २. दुसर्‍याचा विचार नसणे : माझ्याकडून दुसर्‍यांचा विचार अल्प प्रमाणात आणि वरवरचा होत असे. कुणी माझ्यासाठी काही केले, तर मी थोडी कृतज्ञता व्यक्त करत असे. रुग्णांच्या अडचणी समजून घेत असे; पण सनातनच्या संपर्कात आल्यावर ‘आपण किती अल्प पडत आहोत !’, हे मला समजले. मग माझ्याकडून सुधारण्याच्या दिशेने थोडे प्रयत्न झाले.

११ इ. गुणवृद्धीसाठी आध्यात्मिक स्तरावरील सूत्र शोधण्याची प्रक्रिया चालू होणे : मला वाटते, ‘गुणांचा विचार करायचा झाल्यास ‘काही गुण आपल्यात अल्पाधिक प्रमाणात उपजत असतात. परिस्थिती आणि आवड या दोन कारणांनी ते वाढतात, तसेच काही प्राप्त होतात.’ या सगळ्यांचा डोळस अभ्यास होत राहिल्यास ते त्यानुरूप विकसित होतात. सनातनच्या संपर्कात येण्याआधी माझा या दृष्टीने माझ्या परीने डोळस अभ्यास झाला; परंतु सनातनच्या संपर्कात आल्यावर कोणत्याही गुणाच्या विकासाच्या दृष्टीने त्यामागील आध्यात्मिक स्तरावरील सूत्र शोधण्याची प्रक्रिया चालू झाली. त्यामुळे सनातनच्या संपर्कात आल्यापासून आजपर्यंतचा स्वतःमधील पालट पाहू गेल्यास तीन ढोबळ गट पडतात.

११ ई. सनातनच्या संपर्कात आल्यावर हळूहळू डोळसपणा येऊन श्रद्धा, भाव आणि भक्ती यांचे अर्थ समजू लागणे : माझ्यामध्ये भगवंताप्रती श्रद्धा, भाव आणि भक्ती आदी गुण जवळपास नव्हतेच. मी ज्या काही धार्मिक कृती करत असे, त्या प्रामुख्याने वडीलधार्‍यांच्या सांगण्यामुळे किंवा जनरीत सांभाळणे आदींमुळे होत असत. मी काही आध्यात्मिक पुरुषांची चरित्रे वाचली, ती मला आवडली. मी काही पुराणकथा वाचल्या आणि कीर्तने-प्रवचने ऐकली. हे सर्व असले, तरी त्यांचा डोळसपणे म्हणजे ‘मी त्यातील काय घेऊ शकतो ? ते स्वतःमध्ये किती आहे आणि ते कसे जोपासायला हवे ?’, याचा माझा फारसा विचार झाला नव्हता. सनातनच्या संपर्कात आल्यावर तो विचार होऊ लागला. मला हळूहळू डोळसपणा येऊन मग त्यातून श्रद्धा, भाव आणि भक्ती यांचे अर्थ समजू लागले.

११ उ. अंतर्मुखता वाढून ‘जे साध्य करावेसे वाटते’, त्या दिशेने प्रयत्न होणे : ‘अंतर्मुखता’ या शब्दाचा ‘साधनेत येण्यापूर्वी आणि साधनेत येऊन नामजपाला आरंभ केल्यानंतर’ समजलेला अर्थ यांत अंतर होते. काही वर्षे साधना केल्यावर आणि ग्रंथांचे वाचन होत गेल्यावर त्याचा अर्थ आणखी समजत गेला. त्यातून ‘मी नेमका किती अंतर्मुख आहे ?’ याचे मापन पालटत राहिले. त्यानंतर जे साध्य करावेसे वाटते, त्या दिशेने यथाशक्ती प्रयत्न होत राहिले.

११ ऊ. ‘जिज्ञासा’ या शब्दाचे महत्त्व समजणे : मला सनातनमध्ये येण्याआधी नवीन शिकण्याची आणि नवीन वाचनाची आवड होती; परंतु ‘जिज्ञासा’ या शब्दाशी त्यांची सांगड नव्हती. त्यामुळे या शब्दाची सांगड नसल्याने त्या सर्व बाबी (ते सर्व), आवड आणि परिस्थितीनुसार विरंगुळा म्हणून होत्या. सनातनशी संपर्क झाल्यानंतर ‘जिज्ञासा’ या शब्दाचे महत्त्व समजले. मग ‘ती कशासंबंधी असायला हवी ?’, हे समजले. त्यानंतर ‘आपण जे नवीन करतो, ते आध्यात्मिक दृष्टीने ‘जिज्ञासा’ म्हणून किती आणि अन्य कारणांनी किती ?’ याचा मला काहीसा बोध होऊ लागला. मग मला परिवर्तनाची थोडी दिशा दिसू लागली.

(क्रमशः)

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२४)

सेवा कोणतीही करत असलो, तरी ‘आसपास सर्व ठीक चालले आहे ना ?’, याकडे लक्ष असणे आवश्यक आहे 

एकदा मी एका खोलीमध्ये बसून संकलन केलेले लिखाण तपासण्याची सेवा करत होतो. मी लिखाण एकाग्रतेने वाचत असतांना काही साधकांनी ‘थर्माकोलच्या शीट’ आणून बाहेरच्या खोलीत ठेवल्या. त्या थोड्या वेडेवाकड्या ठेवल्या होत्या. माझे तिकडे लक्ष गेले नाही आणि कदाचित् लक्ष गेले असले, तरी ‘त्या वेड्यावाकड्या ठेवल्या आहेत अन् त्या सरळ करून ठेवाव्यात’, हे माझ्या लक्षात आले नाही. मला ते माझे दायित्व वाटले नाही. नंतर प.पू. डॉक्टर तेथे आले असतांना त्यांना ‘थर्माकोलच्या शीट’ वेड्यावाकड्या पडलेल्या दिसल्या. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘इकडे लक्ष द्यायला हवे होते. कुणीही वस्तू आणून कशीही ठेवतो, असे कसे चालेल ? मुळात त्या ठेवतांनाच नीट ठेवून घ्यायला हव्यात. आपण आपली सेवा करत असलो, तरी आसपासही लक्ष द्यायला हवे !’’

– डॉ. दुर्गेश सामंत

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/904549.html