विर्डी धरणाला केंद्राकडून मिळाले सर्व दाखले

आक्षेप न घेण्याचा गोवा सरकारचा निर्णय

म्हादई नदी

पणजी, १७ एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्र सरकार विर्डी येथे म्हादई नदीच्या पाण्यावर बांधत असलेल्या धरणाला पर्यावरण मंत्रालयाकडून सर्व दाखले मिळाले आहेत. बेंगळुरू येथे २२ एप्रिल या दिवशी होणार्‍या ‘म्हादई प्रवाह’ प्राधिकरणाच्या बैठकीत या धरणाचे महाराष्ट्राच्या पथकाकडून सादरीकरण होणार आहे. गोवा सरकार विर्डी धरणाला विरोध करणार नाही, अशी माहिती जलस्रोत खात्याने माध्यमांशी बोलतांना दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी या धरणाचे काम चालू केले होते; मात्र याला गोव्यातील काही पर्यावरणप्रेमींकडून विरोध झाल्याने हे काम बंद ठेवण्यात आले होते. आता केंद्राकडून आवश्यक अनुज्ञप्ती मिळाल्याने महाराष्ट्र सरकार या धरणाचे काम आता चालू करणार आहे. बेंगळुरू येथे होणार्‍या ‘म्हादई प्रवाह’च्या बैठकीत गोव्याचे पथक म्हादई खोर्‍यात नव्याने पहाणी करण्याची, तसेच कर्नाटक सरकारने कळसा-भंडुरा प्रकल्पांसंबंधी चालू केलेल्या कामांना स्थगिती देण्याची मागणी करणार आहे. गोवा सरकारने प्रारंभी महाराष्ट्राच्या विर्डी धरणाला आक्षेप घेण्याचे ठरवले होते; मात्र सरकार आता या धरणाला ‘म्हादई प्रवाह’च्या बैठकीत आक्षेप घेणार नाही. महाराष्ट्राच्या विर्डी धरणाचा उन्हाळ्याच्या दिवसांत गोव्यालाच मोठा लाभ मिळणार आहे. उन्हाळ्यात या धरणाचे पाणी वाळवंटी नदीत वळवून त्याचा उत्तर गोव्यातील नागरिकांना लाभ करून देण्याचा गोवा सरकारचा विचार आहे.’’