मालवण – येथील समुद्रात सिंधुदुर्ग किल्ल्यापासून अंदाजे ८ ते ९ सागरी मैल अंतरात प्रकाश झोतात (एल्.ई.डी. लाईटमध्ये) मासेमारी करणार्या रत्नागिरी येथील २ नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाच्या पथकाने १६ एप्रिलच्या रात्री कारवाई केली. या २ नौका कह्यात घेऊन सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेत असणारे विद्युत् साहित्य साहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे. दोन्ही नौकांवर तांडेलसह एकूण ६५ खलाशी होते, तसेच अंदाजे ७ लाख रुपयांचे एल्.ई.डी., जनरेटर आणि इतर सामग्री कह्यात घेण्यात आली आहे. या नौकांना ५ ते ६ लाख रुपये दंड होण्याची शक्यता आहे. मत्स्य विभागाचे पथक, स्थानिक पोलीस, तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक आणि सागरी सुरक्षा रक्षक (मालवण अन् देवगड) यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.