महाराष्ट्रातील एका शहरात ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’च्या आयोजनात आलेल्या अडचणी, झालेला विरोध आणि धर्मप्रेमींनी केलेले साहाय्य यांविषयीचा वृत्तांत येथे दिला आहे.
१. सभेच्या आयोजनात आलेल्या अडचणी
अ. ‘सनातन प्रभात’च्या एका वाचकाने सभेच्या प्रसारासाठी निमंत्रण पत्रिका विनामूल्य छापून देण्याची सिद्धता दर्शवली होती. त्यांना भेटण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे साधक गेले असता त्यांचे दुकान बंद होते. त्यांना कोणत्याच माध्यमातून चार दिवस संपर्क होऊ शकला नाही.
आ. एका हितचिंतकाने सभेसाठी कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून दिले होते. सभेला सहा-सात दिवस शिल्लक असतांना त्यांनी ‘कार्यालयाच्या वरच्या सभागृहात वाढदिवसाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सभेसाठी तुम्ही खालचे सभागृह घेऊ शकता’, असा निरोप दिला.
इ. कार्यालयाच्या खालच्या सभागृहात व्यासपीठ नव्हते. व्यासपीठ उभारण्यासाठी साधकांना वेळ द्यावा लागला. सभेचा प्रसार झाला असल्याने दुसरे स्थळ शोधणे शक्य नव्हते.
ई. सभेच्या दोन दिवस आधी कार्यालयाच्या मालकांनी ‘कार्यालयाच्या वरच्या सभागृहात सभा घेऊ शकता’, असा निरोप दिला.
२. हिंदूविरोधी संघटनांनी केलेला विरोध
अ. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ होऊ नये, यासाठी पोलिसांना निवेदन दिले.
आ. त्यांनी पोलिसांना सांगितले, ‘सभा होऊ देऊ नका. तेथे काही अप्रिय घटना घडल्यास त्याचे दायित्व पोलिसांचेच असेल.’
इ. ‘कोणत्याही परिस्थितीत सभा उधळून लावायची’, असे त्यांनी ठरवले होते.
ई. त्यांनी कार्यालयाच्या मालकांना दूरभाष करून ‘कार्यालयात सभा होऊ नये’, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला होता.
उ. त्यांनी सभा चालू झाल्यानंतर सभेच्या ठिकाणी येऊन सभेत अडथळा आणण्याचे नियोजन केले होते.
३. हिंदुत्वनिष्ठ धर्मप्रेमींनी केलेले साहाय्य
अ. पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीबद्दल विचारणा केल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका पदाधिकार्याने त्यांना सांगितले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य संस्कृती रक्षणाचे आहे. त्यांचे सर्व कार्यक्रम शांततेत पार पडतात. त्यांच्यामुळे कोणतीच अडचण येणार नाही.’’
आ. ‘माझ्या कार्यालयात कोणताही गोंधळ घातलेला मला चालणार नाही’, असे कार्यालयाच्या मालकांनी हिंदूविरोधी संघटनेच्या कार्यकर्त्यांना बजावले होते.
इ. ‘हिंदु राष्ट्र सेने’च्या एका पदाधिकार्याला सभेला होत असलेल्या विरोधाविषयी समजताच त्यांनी हिंदूविरोधी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांना शांत केले. परिणामी सभेच्या दिवशी सभास्थळाकडे विरोधक फिरकलेही नाहीत.
ई. सभेला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शहरातील दोन प्रतिष्ठित अधिवक्ते सभेला प्रत्यक्ष उपस्थित होते.’
– एक साधिका