आता आपल्याला हिंदु राष्ट्राच्याच दृष्टीने विचार करायचा, तर साक्षरता प्रसार, शेतकरी अन् कामकरी यांची संघटना, अस्पृश्यता निवारण, धर्मांतरितांचे शुद्धीकरण आणि अनिष्ट रूढींचे उच्चाटन असे एक ना सहस्र प्रश्न आपल्या या प्रिय राष्ट्राचे कार्य करावयास निघालेल्या माणसापुढे उभे रहातात; पण या प्रश्नांच्या फांद्या ज्या मूळ वृक्षापासून उत्पन्न झाल्या आहेत त्या वृक्षाच्या मुळावरच घाव घातला, म्हणजे या वेगवेगळ्या फांद्या तोडण्याचे परिश्रम नि कालापव्ययही होणार नाही; कारण राष्ट्रीय संघटनेची जाणीव एकदा कुणाही घटकांच्या अंतःकरणात उत्पन्न झाली, म्हणजे तो सारे व्यवहार त्याच्या जाणिवेनुसारच करत राहील. उदाहरणच द्यायचे, तर अशी राष्ट्राच्या एकत्वाची, समानत्वाची आणि संघटित जीवनाची स्पष्ट जाणीव एका मोठ्या कारखानदाराला झाली अन् त्याच वेळी ती त्याच्या कारखान्यात काम करणार्या कामगारांनाही झालेली असली, तर वर्गकलह निर्माण होण्याची शक्यता आहे का ? किंवा पूर्वी उत्पन्न झाली असेल, तर तो परस्पर सहानभूतीच्या आणि प्रेमाच्या आंचेने वितळून जाणार नाही का ?
(साभार : ग्रंथ ‘अज्ञाताची वचने’, संचालक : अमरेंद्र गाडगीळ)