जलजीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप प्रकरणी चौकशी समिती स्थापन

रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची चौकशी चालू

रत्नागिरी – जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामात अनुमाने ६०० कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते स्वप्नील खैर यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी ४ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची चौकशी चालू करण्यात आली आहे.

१. जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील सर्व घरांमध्ये वैयक्तिक घरगुती नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पाणी पुरवण्यासाठी शासनाकडून जलजीवन मिशन योजना राबवण्यात येत आहे; मात्र या योजनेतून लोकांना पाणीपुरवठा होण्याऐवजी त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने अनेक ठिकाणी कामे रखडली आहेत, असे माहिती अधिकारातून उघड झाली आहे.

२. या योजनेतील कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीही वाढत चालल्या होत्या. पाणी योजनांच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविषयी माहिती अधिकार कार्यकर्ते स्वप्नील खैर हे गेल्या २ वर्षांपासून ते यासंदर्भात पाठपुरावा करत आहेत.

३. आता खैर यांनी केलेला आरोप आणि त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत जलजीवन मिशनच्या अभियान संचालकांच्या माध्यमातून योजनेतील कामांच्या चौकशीसाठी उपअभियंता संजय दीपंकर, निवृत्त उपअभियंता प्रवीण म्हात्रे, लेखाधिकारी चंद्रसेन, उपलेखापाल दिनेश पोळ यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली आहे.

४. या समितीचे सदस्य १५ एप्रिलला रत्नागिरीत आले असून २ दिवस त्यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात जाऊन कागदपत्रांची तपासणी केली.

५. आता या समितीचा सविस्तर अहवाल अभियान संचालकांकडे सादर केला जाणार आहे.

भ्रष्टाचाराची पुनरावृत्ती …


रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई असतांना ‘जलजीवन मिशन योजने’त ६०० कोटी रुपयांहून अधिक भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. ‘जलस्वराज्य योजने’तही कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. या योजनेचीही चौकशी करण्यात आली होती; मात्र संबधित दोषींवर कोणतीच कारवाई झाली नाही. शेवटी ही योजनाच सरकारने बंद केली होती. आता ‘जलजीवन मिशन योजने’तील भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यामुळे जिल्हावासियांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.