प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प्रश्न : किं नु हित्वा प्रियो भवति ?
अर्थ : कशाचा त्याग केला असता मनुष्य लोकप्रिय होतो ?
उत्तर : मानं हित्वा प्रियो भवति ।
अर्थ : मान सोडला, अहंकाराचा त्याग केला, अभिमान नसला, म्हणजे मनुष्य लोकप्रिय होतो.
अहंकार, गर्व आणि ताठरता हे लोकप्रियता मिळण्याच्या मार्गातील फार मोठे अडथळे आहेत. हे पटणे थोडे कठीण आहे. ‘स्वाभिमान ठेवला पाहिजे आणि अस्मिता टिकवली पाहिजे’, असे प्रतिपादन करून साहित्यिकांनी गोंधळ निर्माण केला आहे. २ अहंकारांमध्ये सर्वदाच संघर्ष निर्माण होत असतो. दुसर्याला मान देण्यामध्ये आपण स्वाभिमान सोडला, असे माणसाला वाटते. आपल्याला कुणी मान दिला नाही, म्हणजे आपला अहंकार दुखावतो. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये अहंकार उभा रहातो आणि द्वेषमत्सरादी विकार बळावतात.
१. मानाची वा लोकप्रियतेची अपेक्षा ठेवली नाही, म्हणजे लोकप्रियता मिळते !
लोकप्रियता मिळवायची असेल, तर असा अहंकार सोडला पाहिजे. भर्तृहरीने ‘नम्रता’ हे उन्नतीचे साधन सांगितले आहे; पण या वृत्तीचा पूर्ण आविष्कार संतांच्या ठिकाणी आढळतो. संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज यांनी दृष्टांत देऊन एका ब्राह्मणाला जगद्गुरु संत तुकोबारायांना शरण जाण्यास सांगितले. तेव्हा श्रीज्ञानेश्वर महाराजांना उद्देशून श्रीतुकोबाराय म्हणाले, ‘मज पामरासीं काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी ।’, म्हणजे ‘संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘मी पामर आहे. माझ्याकडे काय श्रेष्ठत्व आहे ? जशी पायातील चप्पल पायातच ठेवतात, तसा मी माझ्या जागी योग्य आहे.’ ‘ज्ञानेश्वरी’ लिहायला घेतली, त्या वेळी श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ‘मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें येथ ।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १, ओवी ६८), म्हणजे ‘त्याप्रमाणे की, अल्पज्ञ हे गीतार्थ सांगण्याच्या कामी प्रवृत्त झालो आहे.’ हिमालयाच्या उंचीने ज्यांची महती मोजावी लागेल, अशी ही थोर माणसे अत्यंत नम्रतेने बोलतात आणि विनयाने वागतात; म्हणून त्यांची लोकप्रियता आजही चढत्या-वाढत्या प्रमाणात टिकून आहे. श्रीज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या प्रतिवर्षी पुण्यातून पंढरपुरास जातात. केवढा प्रचंड जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी ताटकळत उभा असतो, हे आपण प्रत्येक वेळी पहातो ना ! पुढार्याच्या सभेला त्याची लोकप्रियता सिद्ध व्हावी; म्हणून पुष्कळ संख्येने लोक गोळा होण्यासाठी प्रचार करावा लागतो, प्रलोभने दाखवावी लागतात, वाहनांची व्यवस्था करावी लागते. तरी गणवेशातील आणि गणवेशांवाचून असलेल्या सुरक्षा दलातील व्यक्तींचीच संख्या अधिक असते. मानाची अपेक्षा ठेवली नाही, म्हणजे लोकप्रियता मिळते, हे कसे खरे आहे, ते या उदाहरणावरून स्पष्ट होते.
२. मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारा व्यक्ती लोकांमध्ये मान्यता पावतो !
‘श्रीविष्णुसहस्रनामा’मध्ये विष्णूची जी नावे आलेली आहेत, त्यात ‘अमानी, मानदः आणि मान्यः’, अशी ३ नावे ओळीने आली आहेत, त्यात मोठी मार्मिकता आहे. अमानी, म्हणजे ज्याला मानसन्मानाची मुळीच अपेक्षा नाही. ‘स्वतःला मान सन्मान नको आहे; म्हणून दुसर्याला मान कशाला द्यावयास पाहिजे’, असे तो म्हणत नाही. ‘तो दुसर्याला योग्य प्रकारे मान देतो’, म्हणून ‘मानदः’ आणि या दोन्ही गुणांचा स्वाभाविक परिणाम म्हणून तो सहजच लोकांमध्ये ‘मान्यता पावतो’ म्हणून ‘मान्यः’.
मानाची अपेक्षा नसणे आणि अहंकारी नसणे, अशी वृत्ती असणार्या माणसाच्या मागे मानमान्यता अन् लोकप्रियता आपणहून लागते.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)
(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)