पैसा कमवण्याचे साधन !

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या घटनेच्या निमित्ताने अन्य धर्मादाय आणि खासगी रुग्णालयांच्या संदर्भातील वास्तव पुढे आले आहे. या निमित्ताने खोर्‍याने पैसा ओढून किंवा काही वेळा अक्षरशः लुबाडून रुग्णांची आबाळ करणार्‍या रुग्णालयांचे वास्तव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सध्या रुग्णांकडून अवाच्या सवा पैसे उकळणारी रुग्णालये आणि आधुनिक वैद्य हे एखाद्या खासगी आस्थापनाप्रमाणे काम करतात. सध्याचे काही आधुनिक वैद्य हे त्यांच्या मूळ कर्तव्यांपासून, रुग्णसेवेपासून, ध्येयापासून लांब जाऊन रुग्णालये, म्हणजे केवळ व्यवसाय आणि पैसे कमवण्याचे साधन मानतात.

५० वर्षांपूर्वीपर्यंत ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’, अशी श्रद्धा आणि कर्तव्याचे पालन करणारी रुग्णालये अन् आधुनिक वैद्य होते. काही प्रसंगी गरीब रुग्णांवर विनामूल्य उपचारही केले जात होते. गरिबांवर पैशाअभावी वैद्यकीय उपचार होत नसल्याचे दिसून आल्यानंतर सरकारकडून त्यांच्यासाठी अनेक आरोग्यविषयक योजना कार्यवाहीत आणल्या. धर्मादाय रुग्णालयांमध्ये या योजनांची कार्यवाही करण्याची सक्ती करण्यात आली.

आता रुग्णसंख्याही वाढली. आता आरोग्याच्या समस्याही जटील होत चालल्या आहेत. रुग्ण तपासणीच्या आणि चाचणीच्या पद्धती अन् त्या संदर्भातील कायदेही पालटले आहेत. आता कित्येकदा रुग्णालयात कर्मचारी रुग्णांशी उद्दामपणे बोलतात. त्यांच्या सोयीचाही विचार करत नाहीत. अनेक रुग्णालयांमध्ये पैशाअभावी रुग्णांवर उपचार न करणे, देयके भरली नसल्याने मृतदेह स्वाधीन न करणे, देयके अवाजवी वाढवणे असे प्रकार सर्वत्र घडतांना दिसू लागले. रुग्णालयात आकारल्या जाणार्‍या देयकांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षांत विशेषतः खासगी रुग्णालयांत व्यावसायिक दृष्टीकोनातून पहाण्यास आरंभ झाला आहे. त्यातून पैसा कमवण्यासाठी आणि सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून रहाण्यासाठी ‘आम्ही किती चांगल्या पद्धतीने सेवा देतो’, ‘आमच्याकडे उच्चशिक्षित आधुनिक वैद्य, २४ घंटे उपचार सुविधा आहेत’, अशा प्रकारे विज्ञापने करण्यात येऊ लागली. शिबिरे आयोजित करून तेथे येणारे रुग्ण आपल्या रुग्णालयाकडे वळवणे, रुग्णालयासाठी केलेली गुंतवणूक वसूल करण्यासाठी आधुनिक वैद्यांवर दबाव टाकणे, देयक वाढवणे, सरकारी योजनांमधून उपचार केले, अशी खोटी नावे देऊन सरकारकडून पैसे लाटणे आदी अपप्रकार होऊ लागले. या सर्व प्रकारांवर सरकारी नियमांनी अनेक बंधने घालून रुग्णालयांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न अल्प आहे. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’, या ध्येयाने उभारल्या जाणार्‍या रुग्णालयाच्या प्रशासनाने वेळीच जागे व्हावे. तसे झाल्यास ती खरी ईश्वरसेवा होईल.

– श्री. अमोल चोथे, पुणे