सक्ती केल्यास हिंदी अभ्यासक्रमाची पुस्तके दुकानांत विकू देणार नाही ! – राज ठाकरे

इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्यशासनाच्या धोरणाला मनसेचा विरोध

राज ठाकरे

मुंबई – महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची केलेली सक्ती खपवून घेतली जाणार नाही. असे केले, तर शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तके दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांनाही ती पुस्तके विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, अशी चेतावणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिली. ‘महाराष्ट्र राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४’ या नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी राज ठाकरे यांनी भूमिका मांडली.

ते पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येक राज्यात केवळ त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहिजे. भविष्यात सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का ? मग महाराष्ट्रात हिंदीची सक्ती का ? हे सूत्र सरकारने ताणू नये. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की, ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न चालू आहेत, ते महाराष्ट्रात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी राष्ट्रभाषा नाही. देशातील अन्य भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात पहिलीपासून का शिकायची ? त्रिभाषेचे सूत्र सरकारी व्यवहारापुरतेच मर्यादित ठेवा. त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. भारताची भाषावार प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्षे टिकली, मग आताच अन्य प्रांताची भाषा महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का चालू झाले ? यामुळे भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वालाच हरताळ फासला जात आहे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान अन्य भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान अन्य राज्यांत त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी अन्य राज्यात रहाणार्‍या मराठीजनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे, हा आमचा आग्रहच आहे; पण देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल, तर ते आम्हाला मान्य नाही. आम्ही ‘हिंदु’ आहोत; पण ‘हिंदी’ नाही. महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल, तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे.’’