
मुंबई – महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहेच; परंतु लोक हिंदी आणि इंग्रजी यांसह अन्य भाषाही शिकू शकतात, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ एप्रिल या दिवशी केले. त्यांनी विलेपार्ले येथे मुंबई मेट्रो मार्गावरील डाऊनलाईन टनल ब्रेकथ्रू कार्यक्रमाची पहाणी केली आणि संबंधित अधिकार्यांकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग आळवणी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार सर्वांना मराठी भाषा यायला हवी. यासह देशातील इतर भाषाही यायला हव्यात. आपल्या देशात एक संपर्क भाषा असावी, हा केंद्र सरकारचा प्रयत्न असून त्यादृष्टीने हा प्रयत्न केला आहे. देशामध्ये एक संपर्कसूत्र सिद्ध असणे आवश्यक असून हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे.’’