|
नवी देहली – सर्वाेच्च न्यायालयात १७ एप्रिलला वक्फ सुधारणा कायद्याच्या संदर्भात झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर देण्यासाठी ७ दिवसांची समयमर्यादा देत पुढील सुनावणी ५ मे या दिवशी ठेवली. सरकारने दिलेल्या उत्तरानंतर याचिकाकर्त्यांनी पुढील ५ दिवसांत त्यांचे उत्तर द्यायलाही न्यायालयाने या वेळी सांगितले.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला २ कलमांवर स्थगिती देण्याचे आश्वासन दिले. त्याला सर्वोच्च न्यायालयाने संमती दिली. यात पुढील सुनावणी होईपर्यंत नव्या कायद्यानुसार बाहेरील सदस्यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती केली जाणार नाही, तसेच वक्फ बोर्डाने एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची असल्याचे घोषित केले असेल, तर त्यात पुढील सुनावणीपर्यंत हस्तक्षेप करणार नाही.
५ प्रमुख याचिकांवरच न्यायालय सुनावणी करणार !
या कायद्याच्या संदर्भात १०० हून अधिक याचिका प्रविष्ट (दाखल) झाल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाने या याचिकांतील प्रमुख ५ याचिकांवर सुनावणी करण्याचे घोषित केले आहे.