CM Yogi On Bengal Violence : पूर्वी उत्तरप्रदेशही मुर्शिदाबादप्रमाणे जळत होता; मात्र आज तो दंगलमुक्त आहे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – आज मुर्शिदाबाद जळत आहे. लक्षात ठेवा, वर्ष २०१७ पूर्वी उत्तरप्रदेशातही असेच घडत होते; मात्र आज उत्तरप्रदेश दंगलमुक्त आहे, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे ‘अमर उजाल’ या हिंदी दैनिकाच्या एका कार्यक्रमात केले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, वर्ष २०१७ पूर्वी उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगर दंगल ६ महिने चालली. बरेली येथे एका वर्षात ४ दंगली झाल्या. अलीगड, लक्ष्मणपुरी, कानपूर आणि असा कोणताही जिल्हा नव्हता, जेथे दंगली होत नव्हत्या. जेव्हा एखादा सण जवळ यायचा, तेव्हा त्या सणाचा उत्साह अल्प व्हायचा; कारण सज्जन आणि सभ्य लोकांना दंगलींची भीती वाटायची.

दंगल होईल आणि व्यापार्‍यांचा माल जाळला जाईल, अशी भीती असल्याने व्यापारी व्यवसाय करण्यास घाबरत होते. आज दंगली होत नाहीत, आज उत्तरप्रदेश दंगलमुक्त आहे. आज उत्तरप्रदेश प्रत्येक सण उत्साहाने साजरा करतो.

कुंभमेळ्यात ६६ कोटी लोक येऊनही एकही चोरी झाली नाही !

मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ म्हणाले की, संपूर्ण भारत कुंभमेळ्याला आला होता. प्रयागराजच्या भूमीवर ६६ कोटींहून अधिक भाविक आले. कुठेही दरोड्याची, चोरीची, अपहरणाची घटना घडली नाही. या काळात कोणतीही गुन्हेगारी घटना घडली नाही.  उत्तरप्रदेश आणि प्रयागराज येथील लोकांनी विवेकाची छाप सोडली आहे. शेवटी हे उत्तरप्रदेश कसे पालटले ? हा तोच उत्तरप्रदेश होता, जिथे प्रत्येक दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी दंगली होत होत्या.

संपादकीय भूमिका

दंगलमुक्त करण्यासाठी दंगली करणार्‍या धर्मांध मुसलमानांच्या नाड्या आवळणे आवश्यक असते, तेच गुजरातचे मुख्यमंत्री असतांना नरेंद्र मोदी यांनी केले आणि उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत आहेत. असे अन्य राज्यांतील मुख्यमंत्र्यांना का जमत नाही ? तेथील हिंदूंनी त्यांना जाब विचारला पाहिजे !