अनधिकृत होर्डिंगमुळे तुर्भे आणि वाशी परिसर विद्रूप !

स्वच्छ भारत अभियानाला गालबोट !

नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई – शहरामध्ये स्वच्छ भारत अभियानाची मोहीम गतीशील होत आहे; पण स्थानिक राजकीय पुढार्‍यांच्या अनधिकृत होर्डिंगमुळे तुर्भे आणि वाशी परिसर विद्रूप झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परवाना विभागाकडून, तसेच विभाग कार्यालयाकडून कोणतीही अनुमती न घेता होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. यामुळे महानगरपालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

१. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या काळात या प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्या वेळी कुणीही अनधिकृत होर्डिंग किंवा बॅनर लावले नाही. आयुक्त पालटल्यावर पुन्हा वरील प्रकार चालू झाला.

२. काही ठिकाणी होर्डिंगमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे; पण वाहतूक पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात.

३. काही होर्डिंग ‘स्वच्छ भारत सर्वेक्षणा’चे लोगो आणि बॅनर यांवर लावण्यात आले आहेत. (हे तर आणखीनच लाजिरवाणे आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे सवंग प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लावणार्‍यांवर नवी मुंबई महापालिका कारवाई का करत नाही ?