मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक : ‘सन्मान छत्रपतींचा-स्वाभिमान महाराष्ट्रा’चा !

कोल्हापूर, २ मार्च (वार्ता.) – येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्याने विद्यापिठाचे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे करण्यात यावे, या मागणीसाठी १७ मार्च या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी ३ वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा पूर्णशक्तीनिशी यशस्वी करण्याचा निर्धार मोर्चाच्या नियोजनासाठी १ मार्च या दिवशीच्या आयोजित बैठकीत करण्यात आला. हिंदु राष्ट्र समन्ववय समिती आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित बैठकीसाठी विविध संप्रदाय, गडप्रेमी संघटना, वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक संघटना, तरुण मंडळे, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष यांचे २०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मोर्चाच्या सिद्धतेविषयी माहिती देतांना हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘या निमित्ताने आम्ही विविध लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्यावर सर्वांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. अनेकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘लक्षवेधी’ लावू, ‘औचित्याचा मुद्दा’ उपस्थित करू, असे सांगितले. राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना ‘हिंदु’ म्हणून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. काही लोक बुद्धीभेद करून ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झाल्यास त्याचे ‘लघुरूप’ होईल’, असे ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) पसरवत आहेत. मोर्चासाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे आशीर्वाद असून धारकरीही यात सहभागी होतील.’’

मान्यवरांचे मनोगत
‘श्री’ संप्रदायाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. कृष्णाजी माळी म्हणाले, ‘‘मोर्चासाठी जगद्गुरु रामानंदाचार्य प.पू. नरेंद्राचार्यजी महाराज यांचा आशीर्वाद असून सांगली, कोल्हापूर, बेळगाव येथून मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी होतील.’’ ‘छत्रपती ग्रुप’चे संस्थापक श्री. प्रमोददादा पाटील म्हणाले, ‘‘आपण जरी वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करत असलो, तरी हिंदुत्वाच्या कार्यासाठी संघटित झाले पाहिजे. अनेक मंडळांपर्यंत हा विषय पोचवला पाहिजे. यात कोणताही राजकीय स्वार्थ नसून अस्मितेसाठी आपण झटत आहोत. आपण धर्मासाठी एकत्र आले पाहिजे.’’ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव म्हणाले, ‘‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या प्रमुखांना घेऊन बैठक ठरवू. सहस्रोंच्या संख्येने धारकरी येण्यासाठी प्रयत्न करू.’’ वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. शिवा काशीद म्हणाले, ‘‘विविध ग्रामपंचायतींचे ठराव मिळणार आहेत. मर्दानी खेळ, शिवकालीन युद्धकला सादर करणारी पथके, तालीम यांना संपर्क केला असून त्यांनी मोर्चासाठी येणार असल्याचे सांगितले.’’ वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. अनिल यादव महाराज म्हणाले, ‘‘वारकरी संप्रदायाचे भाविक मोठ्या संख्येने यात सहभागी होतील यासाठी प्रयत्न करू.’’ हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ म्हणाले, ‘‘कोल्हापुरातील प्रत्येक मंडळापर्यंत आम्ही पोचणार असून त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहातील. आम्ही ज्या ज्या लोकप्रतिनिधींना भेटलो, त्या सर्वांनी पाठिंबा देऊन मोर्चाचा प्रचार करणार असल्याचे सांगितले.’’ कागल येथील ‘श्री छत्रपती फोर्स’चे श्री. अजितसिंह कदम म्हणाले, ‘‘गेल्या ७ वर्षांपासून यासाठी आम्ही प्रयत्न करतच आहोत. आम्ही सहस्रो राष्ट्रप्रेमींच्या यासाठी स्वाक्षर्या घेतल्या आहेत.’’ ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे कोल्हापूर सहजिल्हासंयोजक श्री. अभिजित पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील प्रत्येक मंदिरापर्यंत हा विषय पोचवून मंदिराबाहेर फलक लागण्यासाठी प्रयत्न करू.’’ मनसे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. अभिषेक राऊत म्हणाले, ‘‘मोर्चासाठी विद्यार्थी संघटनांपर्यंत पोचून मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित रहाण्यासाठी प्रयत्न करू.’’ मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंतराव जांभळे म्हणाले, ‘‘मंदिरे, सेवा सोसायटी, ‘रोटरी’सारख्या सामाजिक संस्थांचे ठरावही आपल्याला मिळतील.’’ शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख श्री. महेंद्र चंडाळे म्हणाले, ‘‘सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिकांसह आम्ही मोर्चात सहभागी होऊ.’’

ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. शरद माळी, हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर यांसह विविध संघटनांच्या प्रमुखांनी प्रचाराच्या विविध संकल्पना मांडून त्या कृतीत आणू, अशी ग्वाही दिली. बैठकीसाठी ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य श्री. कृष्णात पाटील, ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, हिंदु महासेभेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजू तोरस्कर, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, जयसिंगपूर भाजपचे शहर चिटणीस श्री. सुनील ताडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांच्यासह अधिवक्ता, आधुनिक, उद्योजकही उपस्थित होते.

याच मागणीसाठी कागल येथील ‘श्री छत्रपती फोर्स’चे श्री. अजितसिंह कदम यांनी सिद्ध केलेल्या विशेष निवेदनाचे मान्यवरांच्या हस्ते सादरीकरण करण्यात आले.

अन्य घडामोडी
बैठकीत हस्तपत्रके, होर्डिंग्ज, भित्तीपत्रके, रिक्शाद्वारे उद्घोषणा, सामाजिक माध्यमे यांद्वारे व्यापक प्रसाराचा निश्चय करण्यात आला.
विद्यार्थ्यांपर्यंत विषय पोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी संपर्क अभियान राबवण्याचे ठरले.
आढावा बैठकीसाठी उपस्थित मान्यवर
आढावा बैठकीसाठी व्यासपिठावर उपस्थित डावीकडून श्री. अभिजित पाटील, श्री. गजानन तोडकर, श्री. आनंदराव पवळ, श्री. सुनील घनवट, श्री. शिवानंद स्वामी, श्री. कृष्णाजी माळी आणि श्री. प्रमोददादा पाटील (उजवीकडे)
संपादकीय भूमिकाशिवाजी विद्यापिठाच्या योग्य नामविस्तारासाठी जनतेला मोर्चा काढायला लावणारे प्रशासन शिवद्रोहीच ! |