आपला इतिहास अभिमानास्पद आहे; परंतु आज प्रश्न उपस्थित होतो की, आज आम्ही देशाकरता काय करत आहोत ? किंवा प्रतिदिनच्या जीवनामध्ये एक देशभक्त देशप्रेमी नागरिक म्हणून आम्ही देशाकरता काय करू शकतो ? याविषयीचे माझे काही विचार येथे देत आहे.
१. स्वतःला विचारा, ‘मी या देशासाठी काय करतो ?’
कुठलाही देश महाशक्ती बनण्यामध्ये देशातील सामान्य नागरिकांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असतो. असे असेल, तर भारतीय म्हणून देशाप्रती स्वतःचे उत्तरदायित्व आपण पूर्णपणे निभावत आहोत का ? तर याचे उत्तर ‘नाही’, असे आहे.
२. उत्तरदायी नागरिक बना !
‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली मी काहीही लिहू शकतो, बोलू शकतो, प्रक्षोभक लिखाण सामाजिक माध्यमांवर प्रसारित करू शकतो. त्यामुळे हिंसाचार झाला, तरी पर्वा नाही’, अशी मानसिकता चुकीची आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतियाला जसे अधिकार दिले आहेत, तशीच काही कर्तव्येसुद्धा दिली आहेत. बर्याच वेळेला या कर्तव्यांकडे अनेक दुर्लक्ष करतात.

‘सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे, तिची जपणूक करणे’, हेसुद्धा आपलेच उत्तरदायित्व आहे, याचा बहुतेकांना विसर पडतो. सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणे, जागा मिळेल तिथे मलमूत्र विसर्जन न करणे, सार्वजनिक अस्वच्छता हा नवीन विषय नाही. कारमधून रस्त्यावर प्लास्टिक आणि शीतपेयांच्या बाटल्या भिरकावल्या जातात, किनार्यावर दारूच्या फुटलेल्या बाटल्यांचा खच असतो, हे आपल्यातीलच काही सुशिक्षित लोक करतात. परिसर स्वच्छ ठेवणे, हे आपले उत्तरदायित्व आहे. आपल्याकडील कचरा रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी आपण सर्रास टाकतो. ‘येथे स्वच्छता राखा’, असे लिहिलेल्या पाटीखालीच कचर्याचा डोंगर असतो, म्हणजे ‘नियम हे मोडण्यासाठीच असतात’, अशी आपली धारणा आहे.
आपण इतके दायित्वशून्य आहोत की, काही झाले की, लगेच ‘या सगळ्यांसाठी सरकार उत्तरदायी आहे’, असे म्हणून त्यातून अंग काढतो. आज प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. नाले, गटार हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी असतात, कचरा टाकण्यासाठी नाही; पण तरीही नाल्यांना ‘डंपिंग ग्राऊंड’चे (कचरा टाकण्याचे ठिकाण) रूप आलेले दिसते. ‘ओला आणि सुका कचरा वेगळा टाकावा’, अशा सूचना वारंवार महानगरपालिका किंवा नगरपालिका यांच्याकडून दिल्या जातात. तरीही हा नियम अनेक जण पायदळी तुडवतात. आपण उत्तरदायी नागरिक का बनत नाही ?
३. शहरांमधील वाहतुकीला शिस्त लावा !
वाहतुकीचे नियम जितके आपल्याकडे मोडले जातात, तितके क्वचितच इतरत्र मोडले जात असतील. वाहने अस्ताव्यस्त पद्धतीने उभी (पार्किंग) करणे, ओव्हरटेक करणे, हे अगदी छातीठोकपणे आपल्याकडे केले जाते. नियम मोडण्यात सुशिक्षित-अशिक्षित दोघेही आघाडीवर, हेच आपले दुर्दैव आहे. वेगवेगळ्या मिरवणुका काढून शहरांमध्ये वाहतुकीची कोंडी अजून कठीण करणे चालूच आहे.
वाहतूक पोलिसांची मजबूत फळी असावी. वाहतूक नियम मोडणार्या नागरिकांना शिक्षा द्यावी. वाहतुकीचे नियम पाळून आपण प्रचंड प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेल यांची बचत करू शकतो अन् देशाच्या उर्जा सुरक्षेला साहाय्य करू शकतो.
ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांना ‘नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे वीररत्न पुरस्कार २०२५’ प्रदान
‘नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे शौर्य दिवस’ ४ फेब्रुवारीला सिंहगडावर पार पडला. अनेक शिवप्रेमी, गडदुर्ग प्रेमी यांनी येथे विविध कार्यक्रम साजरे केले. यामध्ये लाठीकाठी, दांडपट्टा, तलवार फिरवणे, असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. त्याच दिवशी ‘गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट’च्या माध्यमातून ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांना ‘नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे वीररत्न राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये मानपत्र, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची प्रतिमा आणि तलवार भेट देण्यात आली. सुभेदार तानाजी मालुसरे शूर होते आणि त्यांनी देशाप्रती स्वतःचे उत्तरदायित्व निभावले.
४. हिंसक आंदोलनाचा देशावर मोठा दुष्परिणाम
गेल्या काही मासांपासून महाराष्ट्रासह देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक हानी होते, ती सामान्य माणसांची. स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जे हिंसाचार घडत असलेल्या ठिकाणी अडकतात आणि ते मारहाण, जाळपोळ यामध्ये अडकतात. कामाकरता बाहेर पडलेल्या लोकांना अचानक उसळलेल्या हिंसाचाराला सामोरे जावे लागते. शहरात हिंसाचार, दूध आंदोलन, शेतकरी आंदोलन यांमध्ये सामान्य माणसांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ज्यांनी ही आंदोलने पुकारली, त्यांच्यामुळे देशाची शेकडो कोटी रुपयांची आर्थिक हानी झाली आहे.
राज्यातील महत्त्वाचे रस्ते बंद केल्यास अर्थव्यवस्थेची प्रचंड प्रमाणामध्ये हानी होते. देहलीत झालेल्या तथाकथित शेतकरी आंदोलनामुळे २ रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्रेटर देहलीचे प्रतिदिन सहस्रो कोटी रुपयांची हानी होत होती. एवढी हानी कुठल्याही प्रकारच्या आतंकवादामुळे झालेली नाही. हिंसक आंदोलने हा आतंकवादाचा प्रकार मानला पाहिजे. देशातील एखाद्या समाजावर अन्याय होत असेल, तर त्या अन्यायाला प्रत्युत्तर म्हणून हिंसा हा उपाय नाही. भारतीय कायदा हिंसाचाराचे समर्थन करत नाही. एखाद्या समाजाला वा संघटनांना सरकारकडून कोणतीही मागणी मान्य करून घ्यायची असेल, तर ती कायद्याच्या चौकटीत राहून केली पाहिजे.
आता चालू असलेल्या वर्षामध्ये अनेक निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या हिंसांचे, आंदोलनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हिंसाचाराला रोखून सामान्य माणसाचे रक्षण केले पाहिजे. गेल्या काही काळात झालेल्या हिंसाचाराला अनेक संस्था, अनेक राजकीय पक्ष उत्तरदायी आहेत. मणीपूरमधील हिंसाचारामध्ये मैतेयी जमातीला कुकी जमातीची हानी आणि कुकी जमातीला मैतेयी जमातीची हानी भरपाई करण्यास भाग पाडले पाहिजे. प्रसिद्धीमाध्यमे, सामाजिक माध्यमे, वृत्तसंस्था अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनांना विनाकारण अतीप्रसिद्धी देतात. वृत्तपत्रामध्ये हिंसाचाराच्या बातम्यांना पान १ वरून पृष्ठ ८ वर नेले पाहिजे.
५. नागरिकांचा सहभाग
सामान्य माणसांनी पोलिसांचे कान आणि डोळे बनले पाहिजे. कायदा सुव्यवस्था राखणे, हे पोलिसांचे उत्तरदायित्व असले, तरी नागरिकांच्या सहभागाविना पोलिसांना ते सक्षमपणे करता येणार नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याच्या कामात समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांचे सहकार्य घेतले जावे. संबंधित पोलिस ठाण्यांच्या हद्दीत रहाणार्या नागरिकांमधून कायदा, सामाजिक समस्या आणि राजकीय यांचे जाणकार, अधिवक्ते, डॉक्टर, शिक्षक, अशा सर्व क्षेत्रांतील नागरिकांना निमंत्रित करून त्यांची एक समिती नेमली जावी. या समितीच्या माध्यमातून प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करून कायदा सुव्यवस्था स्थिती राखली जाऊ शकते.
स्थानिक नागरिकांना गुप्त माहिती देण्यासाठी एक ‘टोल फ्री’ क्रमांक दिला पाहिजे, जेणेकरून सामान्य नागरिक त्यांच्याकडील माहिती पोलिसांपर्यंत जलद पोचू शकतात. त्यांच्या नावाची गुप्तता बाळगली पाहिजे. भ्रमणभाष संचाद्वारे हिंसक घटनेचे चित्रण करून पोलिसांकडे पाठवले पाहिजे, जेणेकरून हिंसक आंदोलकांना पकडणे सोपे जाईल.
६. स्वतःचे काम व्यवस्थित करणे हीच देशभक्ती !
अ. रस्त्यावरील सिग्नल पाळणे, रस्त्यावर न थुंकणे, स्त्रियांचा आदर करणे, दिलेली वेळ पाळणे, भ्रष्टाचारास उत्तेजन न देणे; स्वतःच्या आधी लोकांचा विचार, जात आणि प्रांतीयवादाचा पुरस्कार न करणे, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणे, ही देशभक्ती आहे.
आ. मतदान करणे आणि योग्य उमेदवार निवडणे, ही देशभक्ती आहे; मात्र ५० टक्के भारतीय निवडणुकांमध्ये मतदान करत नाहीत अन् मतदानाचा दिवस ‘सुट्टीचा दिवस’ म्हणून मजा करण्यामध्ये घालवतात.
इ. स्वत:च्या क्षेत्रामध्ये वैध मार्गाने यशस्वी होणे, वाद न घालता काम करणे, ही देशभक्ती आहे. गतकाळातील गोष्टींवर वाद न घालणे, स्वत:च्या कर्तव्यांप्रती जागरूक असणे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक विकास कामांना अडथळा निर्माण करून देशाचा विकास थांबवणे, हे सध्या जोरात चालू आहे. स्वत:च्या पलीकडे पहाणे आणि खरे सांगायचे, तर ‘सुजाण नागरिक’ बनण्याचा प्रयत्न करणे, ही देशभक्तीच आहे.
प्रत्येकाने आपापले काम व्यवस्थित करणे, हीच आजच्या काळातील देशभक्ती आहे.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे
संपादकीय भूमिका‘सुजाण नागरिक’ बनणे, हीच खरी देशभक्ती ! देशाचा विकास थांबवण्यासाठी प्रयत्नरत असणार्या अराजक घटकांना देशभक्त नागरिकांनी संघटितपणे थांबवणे आवश्यक ! |