बांदा – तिलारी धरणाच्या कालव्यातून २६ जानेवारीपर्यंत रोणापालपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन तिलारी कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले होते; मात्र फेब्रुवारी महिना उजाडला तरीही कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतीसह पोफळी (सुपारी) आणि माड बागायती यांची हानी झाली आहे. पाणी सोडण्याबाबत तिलारी कालवा विभागाकडून केवळ खोटी आश्वासने दिली जात आहेत. येत्या ४ दिवसांत कालव्यातून रोणापालपर्यंत पाणी न सोडल्यास शुक्रवार, ७ फेब्रुवारी या दिवशी कालव्यात बसून धरणे आंदोलन करण्याची चेतावणी माजी सरपंच सुरेश गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तिलारी कालव्यातून पाणी सोडण्याच्या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुरेश गावडे पुढे म्हणाले, ‘‘निगुडे येथे कालवा दुरुस्तीची कामे संबंधित ठेकेदारांकडून संथ गतीने चालू आहेत. खोदाई केलेली माती कालव्यातच टाकण्यात आली आहे. ठेकेदारांवर अधिकार्यांचा कोणताही वचक नसल्याने ठेकेदार मनमानीपणे काम करत असल्याचे चित्र आहे. तिलारी कालवा विभागाच्या मुख्य उद्देशालाच अधिकार्यांनी हरताळ फासला आहे. पाण्याअभावी शेती आणि बागायती यांच्या होणार्या हानीस तिलारी कालवा विभाग पूर्णपणे उत्तरदायी राहील.’’
संपादकीय भूमिकाअशी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! |