दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अभिनेता सैफवरील आक्रमणकर्त्याकडे बनावट ‘सीमकार्ड’; बीडमध्ये आठवले टोळीवर कारवाई…

अभिनेता सैफवरील आक्रमणकर्त्याकडे बनावट ‘सीमकार्ड’

मुंबई – अभिनेता सैफवरील महमंद या आक्रमणकर्त्याने बनावट ‘सीमकार्ड’ घेतल्याचे उघड झाले आहे. ४ वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या नावाने हे बनावट सीमकार्ड आहे. सैफ अलीच्या इमारतीत हातांचे अनेक ठसे घेण्यात आले आहेत; पण महंमद याच्या हातांचे ठसे या ठशांशी जुळत नाहीत.


बीडमध्ये आठवले टोळीवर कारवाई

बीड – येथील आठवले टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. १३ डिसेंबरला या टोळीच्या ६ आरोपींनी गोळीबार केला होता. या टोळीवर गंभीर स्वरूपाचे १९ गुन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी येथील अन्य एका गुन्हेगारी टोळीवरही कारवाई करण्यात आली होती.


यंदाचा ‘जनस्थान’ पुरस्कार घोषित

नाशिक – कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘जनस्थान’ पुरस्कार यंदा प्रसिद्ध लेखक सतीश वसंत आळेकर यांना देण्यात येणार आहे. १ लाख रुपये, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे याचे स्वरूप आहे.


वाशिम येथे पावसामुळे शेतात पाणी

वाशिम – येथे मुसळधार पाऊस झाल्याने शेतात पाणी शिरले. त्याचा फटका पिकांना बसला आहे. वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात पालट करण्याची मागणी येथील शेतकर्‍यांनी केली आहे.


फुले स्मारकाला निधी संमत

पुणे – ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या विस्तारासाठी २०० कोटी रुपयांचा निधी संमत केल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे घोषित केले.


कराडच्या दिमतीला ७ हवालदार – आव्हाड

ठाणे – वाल्मिक कराड याच्या दिमतीला ७ हवालदार आहेत. आपोआप गुन्हे नोंद होतात आणि गुन्हेगार बीड कारागृहात कराडच्या जवळ येतात. रात्री त्यांच्या मैफिली रंगतात, असा गंभीर आरोप कळवा येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. २ कोटीच्या खंडणीप्रकरणी अटक झालेल्या आणि रुग्णालयातून कारागृहात पाठवलेल्या कराड यांच्याविषयी वरील स्फोटक दावा आव्हाड यांनी केला आहे.


अल्पवयीन प्रेमिकांची आत्महत्या

मुंबई – कुटुंबियांकडून होणार्‍या विरोधामुळे एका प्रेमीयुगुलाने एक्सप्रेससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना २६ जानेवारी या दिवशी विक्रोळी रेल्वेस्थानकात घडली. भांडुप येथे रहाणार्‍या नितेश दंडपल्ली (वय २० वर्षे) याचे याच परिसरात रहाणार्‍या १५ वर्षीय मुलीशी अनेक महिन्यांपासून प्रेमसबंध होते.

संपादकीय भूमिका : संयमाच्या अभावी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलणारी सध्याची पिढी देशाला महासत्तेकडे कशी नेणार ?