एक संतांना झालेले आध्यात्मिक त्रास आणि सच्चिदानंद परब्रह्म  डॉ. जयंत आठवले यांनी त्यांच्यासाठी सूक्ष्मातून केलेले नामजपादी उपाय

वर्ष २००३ ते २००७ या कालावधीत एका संतांना वाईट शक्तीचा त्रास होऊन त्यांच्यावर आवरण येणे, काही वेळा असंबद्ध बोलणे, शारीरिक त्रासात वाढ होणे, प्राणशक्ती न्यून झाल्याने पुष्कळ थकवा येणे किंवा कधीतरी काहीच न बोलणे अशा प्रकारचे त्रास होत होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काही वेळा संतांशी प्रत्यक्ष बोलून आणि नंतर त्यांच्याशी वेळोवेळी दूरभाषवर बोलून त्यांना प्रेमाने समजावून सांगितले, तर काही वेळा कुटुंबियांकडे निरोप देऊन किंवा अन्य साधकांना नामजपादी उपाय करायला सांगून त्यांच्या त्रासाची तीव्रता न्यून केली. त्या संदर्भातील सूत्रे येथे दिली आहेत.  

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. वाईट शक्तींनी आक्रमण केल्याने  संत बराच वेळ कुणाशीही न बोलणे आणि  स्वतःला काय होत आहे, हे त्यांना न समजणे 

११.७.२००३ या दिवशी एका संतांवर वाईट शक्तींचे आक्रमण झाले. त्यातच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. वाईट शक्तींनी संतांवर मोठे आक्रमण केले होते. संतांना हलता येत नव्हते. त्याच दिवशी श्री. सत्यवान कदम यांनी (आताचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी) त्या संतांसाठी ६ घंटे नामजपादी उपाय केले. त्यानंतर त्रासाची तीव्रता काही प्रमाणात न्यून झाली. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले संतांच्या खोलीत येऊन म्हणाले, ‘‘मी माझ्या खोलीतून नामजपादी उपाय करतो.’’ त्यांनी खोलीतून उपाय केल्यावर त्रासाची तीव्रता आणखीन न्यून झाली. (त्या वेळी ते संत बराच वेळ कुणाशीही काहीही बोलत नव्हते. त्यांना काय होत आहे, हे समजत नव्हते.) त्यानंतर त्या संतांनी बोलण्यास प्रारंभ केला.

२. संतांना हृदयविकाराचा सौम्य झटका  आल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागणे

२ अ. रुग्णालयात एक बाई पुष्कळ ओरडत असल्याने तिला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याचे साधिकांच्या लक्षात येणे आणि त्यांनी प.पू. डॉक्टरांना दूरभाष करून सांगण्याचे ठरवणे : १६.७.२००३ या दिवशी संतांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. पहिल्याच दिवशी रुग्णालयात त्या संतांच्या पलंगाच्या शेजारच्या पलंगावरील एक महिला पुष्कळ ओरडत होती. तिच्याकडे पाहून मला आणि सहसाधिकेला त्या बाईला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याचे लक्षात आले. तेव्हा आम्ही दोघींनी ठरवले, ‘दूरभाष करून प.पू. डॉक्टरांना सांगूया.’ आम्ही दूरभाष करायला गेल्यावर आमचा दूरभाष लागला नाही.

२ आ. प.पू. डॉक्टर रुग्णालयातच संतांना भेटण्यास आल्यावर त्यांच्या अस्तित्वाने महिलेचा त्रास न्यून होणे : आम्ही पुन्हा रुग्णालयातील जिना चढून वर येण्यास निघाल्यावर प.पू. डॉक्टर त्या संतांना भेटण्यास रुग्णालयातच आल्याने ते निघतांना आम्हाला जिन्यात भेटले. त्या वेळी मी त्यांना म्हणाले, ‘‘बाजूच्या पलंगावर असलेली महिला पुष्कळ ओरडत होती; म्हणून आम्ही तुम्हाला दूरभाष करण्यासाठी खाली गेलो होतो.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘हो का ! आता तरी तेथे सर्व शांत आहे. ती महिला झोपली आहे.’’ प्रत्यक्षात त्यांच्यातील अस्तित्वाने त्या महिलेचा त्रास न्यून झाला होता. केवढी ही गुरूंची कृपा !

२ इ. रुग्णालयातून आल्यावरही संत झोपूनच असल्याने प.पू. डॉक्टरांनी संतांच्या खोलीत येऊन त्यांच्याशी संवाद साधल्यावर चैतन्यामुळे संतांना काही प्रमाणात बरे वाटणे : २४.७.२००३ या दिवशी रुग्णालयातून आश्रमात आल्यावरही त्या संत झोपूनच होत्या. त्यानंतरही अनेक वेळा त्यांना पुष्कळ शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत असे. काही वेळा प.पू. डॉक्टर त्यांच्या खोलीत येऊन त्यांच्याशी संवाद साधत असत. त्या वेळीही गुरुदेवांच्या बोलण्याच्या माध्यमातून चैतन्य मिळून त्यांना काही प्रमाणात बरे वाटत असे.

२ ई. आश्रमात वाईट शक्तींनी संतांवर सतत आक्रमण करणे आणि ‘आश्रमातून घरी नेल्यावर वाईट शक्तींच्या त्रासाचे प्रमाण थोडे न्यून होईल’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे : १८.८.२००३ या दिवशी संतांना पुष्कळ त्रास झाला. आजारी व्यक्तीच्या पलंगावर त्या पलंगाचा पाठीकडील भाग सरळ ठेवून तिथे उशा लावून त्या संतांना बसवले होते. तेव्हा २ घंटे झाले, तरी त्या संतांनी पलंग सरळ करण्यास सांगितले नाही. तेव्हा त्यांच्या सेवेत असणार्‍या साधिकेने त्यांना विचारले, ‘‘तुम्ही नेहमी १० – १५ मिनिटे झाल्यावर लगेच पलंग सरळ करण्यास सांगता; परंतु तुम्ही आज काहीच बोलला  नाहीत ?’’ त्यावर त्या संतांनी काहीच उत्तर दिले नाही. काही मिनिटांनी पुन्हा विचारल्यावरही ते संत काही हालचालही करत नव्हते. तेव्हा प.पू. डॉक्टरांना हे सर्व सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘वाईट शक्ती सतत आक्रमण करत असल्याने त्या संतांना पुष्कळ त्रास होत आहे. आता त्यांना आश्रमातून लगेच घरी नेऊया. इथे त्यांना वाईट शक्ती पुष्कळच त्रास देत आहेत. घरी गेल्यावर त्यांच्या त्रासाचे प्रमाण थोडे न्यून होईल.

३. संत घरी आल्यावर त्यांना झालेले त्रास आणि प.पू. डॉक्टरांनी त्यांच्यासाठी केलेले नामजपादी उपाय

३ अ. प.पू. डॉक्टरांना संतांच्या त्रासाविषयी कळवल्यावर त्यांनी तेथील वाईट शक्ती त्रास देत असल्याचे सांगणे आणि त्यांनी नामजपादी उपाय केल्यावर पुन्हा त्रास न होणे : त्याच दिवशी आम्ही दुपारी घरी जाण्यासाठी चारचाकी गाडीने निघालो. घरी आल्यानंतर ३ – ४ दिवसांनी दिवसातून ७ वेळा असे सलग त्यांना शौचाला झाले. पाव भांडे पाणी प्यायले, तरी शौचाला होत होते. औषधे चालू होती, तरी काहीच न्यून होत नव्हते. हे सर्व प.पू. डॉक्टरांना कळवल्यावर ते म्हणाले, ‘‘आता त्या संतांना तेथील स्थानिक वाईट शक्ती त्रास देत आहेत. तुम्ही काळजी करू नका. मी इथून त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करतो.’’ मी संतांना होत असलेल्या त्रासाविषयी सकाळी १० वाजता कळवले होते. त्यानंतर संतांना पुन्हा शौचाला होण्याचा त्रास झाला नाही.

३ आ. संतांच्या नातेवाईकाच्या माध्यमातून वाईट शक्तींनी त्यांच्याशी बोलून त्यांच्यावर आवरण आणणे आणि प.पू. डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायांमुळे संतांचा त्रास न्यून होणे : काही दिवसांनी त्या संतांच्या एक स्त्री नातेवाईक संतांच्या घरी रहायला आल्या होत्या. वाईट शक्ती त्यांच्या माध्यमातून संतांना पुष्कळ त्रास देत असे. त्यामुळे त्या संतांना त्रास होऊन ते काही वेळेला असंबद्ध बोलत असत. तसेच काही वेळा त्या मी संतांची सर्व सेवा व्यवस्थित करत असूनही त्या संतांवर आवरण आल्यामुळे ते संत मला पुष्कळ बोलत असत, उदा. तू माझे काहीच नीट करत नाहीस. तुझे माझ्यावर प्रेमच नाही. तू मला एकटीला टाकले आहेस. तुला माझे काही करायचे नसेल, तर मला त्या नातेवाइकांकडे नेऊन पोचव. इथे झोपण्याऐवजी मी तिथे तरी सुखाने झोपीन. त्या वेळी वरील सर्व प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर ते साधिकेला त्या संतांभोवती खोके लावणे आणि पलंगाच्या खाली चमेलीच्या ३ उदबत्त्या लावण्यास सांगत असत. त्यांनी सांगितलेल्या उपायांमुळे संतांचा त्रास न्यून होत असे.

३ इ. आध्यात्मिक त्रास असणार्‍या नातेवाईकाने घरातील झुरळे मारण्याचे औषध घेऊन दार लावून घेणे, हे सर्व प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी ४ साधकांना नामजप करण्यास सांगणे अन् आश्रमातून नामजपादी उपाय करणे, अर्ध्या घंट्यांने नातेवाईकाने दार उघडणे, प.पू. डॉक्टरांनी नामजपादी उपाय केल्याने वाईट शक्ती नातेवाइकाला काहीच करू न शकणे : एक दिवस त्या नातेवाईकाला पुष्कळ त्रास होत होता. त्यांना संतांची सेवा करणार्‍या साधिकेचाही पुष्कळ राग आला होता. त्यामुळे त्यांनी त्या संतांच्या घरातील झुरळे मारण्याचे औषध घेतले आणि दार लावून घेतले. ते साधिकेच्या मुलीच्या लक्षात आल्यावर तिने साधिकेला सांगितले. साधिका पळत जाईपर्यंत त्या नातेवाइकांनी दाराला कडी लावून घेतली. पुष्कळ वेळ त्यांना हाक मारूनही त्यांनी दार उघडले नाही. तेव्हा पुढील धोका ओळखून हा प्रसंग प.पू. डॉक्टर यांना कळवल्यावर त्यांनी ४ साधकांना नामजप करण्यास सांगितले आणि ‘मी इथूनच (आश्रमातून) नामजपादी उपाय करतो’, असे म्हणाले. साधारण अर्ध्या घंट्याने नातेवाईकाने दार उघडले. त्यानंतर ते झुरळे मारण्याचे औषध मी दुसरीकडे उचलून ठेवले. प.पू. डॉक्टरांनी नामजपादी उपाय केल्यामुळे वाईट शक्ती त्या नातेवाईकाला काहीच करू शकली नाही.

– संतांची सेवा करणारी साधिका (१६.४.२०२४)

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/878380.html

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक