Mumbai HC On HJS PIL : श्री तुळजाभवानीदेवीचे सोने-चांदी वितळवण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली !

धाराशिव जिल्हाधिकार्‍यांच्या मागणीच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने केलेल्या याचिकेवर निर्णय

संभाजीनगर – श्री तुळजाभवानीदेवीचे सोने आणि चांदी वितळवण्याचा धाराशिव जिल्हाधिकार्‍यांचा अनुमतीचा अर्ज मुंबई उच्च  न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने २३ जानेवारीला फेटाळला आहे, अशी माहिती या संदर्भात खटला लढवणारे अधिवक्ता उमेश भडगावकर यांनी  ‘सनातन प्रभात’ला दिली. न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी हा आदेश दिला आहे. या संदर्भात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने ‘या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात जावे’, अशी सूचना न्यायालयाने दिली आहे. मंदिरातील सोने-चांदी वितळवण्याचा निर्णयाला विरोध करत काही पुजारी आणि हिंदु जनजागृती समिती यांनी न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर हा निर्णय देण्यात आला.

या संदर्भात अधिक माहिती देतांना हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक आणि उच्च न्यायालयाचे अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी यांनी ‘सनातन प्रभात’ला सांगितले,

(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

१. तुळजापूर देवस्थानात वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत तत्कालीन विश्‍वस्त, सरकारनियुक्त अधिकारी, लोकप्रतिनिधी, ठेकेदार या सर्वांनी मिळून ८ कोटी ५० लाख रुपयांचा अपहार केला आहे. हा अपहार झाल्यानंतर प्रशासकीय स्तरावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करणे किंवा आर्थिक वसुली करणे अशी कोणतीच कृती होत नव्हती. त्यामुळे या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाकडे याचिका प्रविष्ट केली होती.

२. या याचिकेत ८ ठेकेदार, ८ सरकारनियुक्त प्रशासक तथा जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने निर्णय देत ९ मे २०२४ या दिवशी या सर्वांच्या विरोधात फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वर्ष २००९ ते २०२४ या कालावधीतील सोने, नाणी वितवळण्यास अनुमती मिळावी, अशी याचिका धाराशिव जिल्हाधिकार्‍यांनी संभाजीनगर खंडपिठाकडे केला. ही अनुमती देण्यात येऊ नये, यासाठी समितीने कडाडून विरोध केला.

३. वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत जो गैरव्यवहार-भ्रष्टाचार, अपहार झाला आहे, तो उघड होऊ नये, तसेच त्याचा अपहार करता यावा; म्हणूनच हे सोने वितळण्याची अनुमती मागण्यात आल्याची दाट शंका आहे, असे म्हणणे समितीने याचिकेत मांडले होते.

४. याचसमवेत संभाजीनगर खंडपिठाने अपहाराच्या संदर्भात गुन्हे नोंद करण्याच्या दिलेल्या आदेशाच्या विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले असून ती सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे धाराशिवच्या जिल्हाधिकार्‍यांचा सोने वितवण्याचा अर्ज संमत करण्यात येऊ नये, अशी मागणी अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता उमेश भडगावकर यांनी समितीच्या वतीने केली होती.

समितीच्या प्रयत्नांमुळे भक्तांच्या श्रद्धेचे रक्षण ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीने भक्तांच्या श्रद्धेचे रक्षण केले आहे. हा विजय म्हणजे न्यायव्यवस्थेवरील भक्तांचा विश्‍वास अधिक दृढ करणारा आहे. समितीच्या प्रयत्नांमुळे देवस्थानातील अपहार आणि भ्रष्टाचार रोखण्यास हातभार लागला आहे. श्री तुळजाभवानीदेवीच्या संपत्तीचे रक्षण आणि अपहार करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही न्यायालयीन लढा चालूच ठेवू.’’

श्री. सुनील घनवट

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –