दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांच्या सभागृह प्रवेशपत्रावरील जातीचा उल्लेख काढणार !

शिक्षण मंडळाचा निर्णय !

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणार्‍या इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेच्या सभागृह प्रवेशपत्रांवर (‘हॉल तिकिटा’वर) विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला होता; मात्र त्यावर शिक्षणतज्ञांनी खेद व्यक्त केला. त्यामुळे शिक्षण मंडळाने माघार घेत प्रवेशपत्रे रहित केली असून ‘जातीचा उल्लेख काढून नवीन प्रवेशपत्रे दिली जातील’, असे घोषित केले.

यंदाच्या प्रवेशपत्रांवर विभागीय मंडळाचे नाव, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थ्याचे नाव, जन्मदिनांक, लिंग, आईचे नाव, विद्याशाखा, अपंगत्व, बैठक क्रमांक, केंद्र क्रमांक आणि केंद्रच्या नावांचा उल्लेख करत प्रथमच प्रवर्ग (जातीचा) उल्लेख केला होता. शाळेत विद्यार्थ्याच्या जातीची नोंद योग्य झाली आहे का ? हे पालक आणि विद्यार्थी यांना कळावे, यासाठी हा उल्लेख असल्याचे स्पष्टीकरण मंडळाकडून देण्यात आले होते.