उकसान गावच्या एका माणसाला महारोग झाला होता. योगायोगाने श्रीमहाराजांशी (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याशी) त्याची गाठ पडली. श्रीमहाराजांनी त्याच्याकडून साडेतीन कोटी जपाचा संकल्प करून घेतला आणि गोंदवल्यास रहाण्यास सांगितले. त्याने ६ वर्षांत जपसंख्या पूर्ण केली. जसजशी जपसंख्या पूर्ण होऊ लागली, तसतशी त्या माणसाची व्याधी झपाट्याने न्यून होऊ लागली. आपण ‘लवकरच रोगमुक्त होणार’, असे त्याला वाटू लागले. एके दिवशी तो श्रीमहाराजांना म्हणाला, ‘महाराज, आपल्या कृपेने मी आता पूर्ण बरा होणार, असे मला वाटू लागले आहे; पण मी जो साडेतीन कोटी जप केला त्याची पुण्याई खर्ची घालून माझा रोग मला बरा व्हायला नको. माझा देहभोग भोगून संपवायला मी सिद्ध आहे.’ त्याचे हे बोलणे ऐकून श्रीमहाराज फार प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, ‘नामस्मरणाने माणसाच्या वृत्तीत आमूलाग्र पालट होतो आणि त्याला वैराग्य प्राप्त होते, याचे हे धडधडीत उदाहरण आहे.’ त्या माणसाकडे वळून श्रीमहाराज बोलले, ‘उत्तम चाकरी केली, म्हणजे दिवाळीला वेतनवाढ तर होतेच, याखेरीज मालक दिवाळीचे काही बक्षीसही देतो. तुमच्या उपासनेवर राम प्रसन्न होऊन दिवाळीच्या बक्षिसापोटी तुम्हाला व्याधीमुक्त करत आहे. त्याचा स्वीकार आनंदाने करावा. नामस्मरणाने तुम्ही जी पुण्याई संपादन केली आहे, ती अबाधित राहिली आहे.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’, या पुस्तकातून; लेखक : ल.ग. मराठे)