कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचे बोलणे आज नाही ! : पुरोगामित्वाची नवी व्याख्या

१९ नोव्हेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘पुरोगामी नावावर खोटारडेपणा खपवला जायला लागल्याने त्याची पोलखोल करणे, मुख्य प्रवाहातील माध्यमांनी त्यांच्या पुरोगामित्वाचा मुखवटा चढवून राजरोसपणे खोटारडेपणा करणे आणि सामाजिक माध्यमे समाजासमोर सत्य उघड करत असल्यामुळे मुख्य प्रवाहातील माध्यमांची विश्वासार्हता संपुष्टात येणे’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/628924.html/

श्री. भाऊ तोरसेकर

४. शेतकरी आंदोलनाचे खोटे वृत्त दिल्यामुळे ‘इंडिया टुडे’ने राजदीप सरदेसाई यांना १५ दिवसांसाठी निलंबित करणे

अलीकडचे ताजे उदाहरण म्हणजे २ वर्षांपूर्वी शेतकरी कायद्याच्या निमित्ताने प्रचंड मोठे आंदोलन असल्याचा देखावा माध्यमांतून उभा करण्यात आला होता. गेल्या वर्षी तो संपला; पण त्या वेळेला ‘गोल्डन स्टँडर्ड’ची पत्रकारिता करणारे ‘इंडिया टुडे’ किंवा ‘आज तक’ वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई हा सर्वांत नामचीन खोटारडा माणूस आहे. म्हणून मी शीर्षक दिले, ‘कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचे बोलणे आज नाही.’ याचे जातीवंत जिवंत उदाहरण म्हणून आपण राजदीप सरदेसाई यांच्याकडे बघू शकतो. तो जेव्हा खोटे बोलतो, तेव्हा तो खोटे बोलतोच; पण तो जेव्हा खरे बोलतो असे म्हणतो, तेव्हाही तो हमखास खोटे बोलत असतो. शेतकरी आंदोलनाच्या वेळी पोलिसांच्या अंगावर एका आंदोलकाने ट्रॅक्टर घातला. तो बेफाम चालवल्याने अनियंत्रित होऊन उलटला. त्यात आंदोलक शेतकरी मरण पावला. त्यानंतर राजदीप सरदेसाई याने ‘पोलिसांच्या गोळीबारात शेतकर्‍याचा मृत्यू झाला’, असे धडधडीत खोटे वृत्त दिले होते. त्यामुळे ‘इंडिया टुडे’लाही लाजेखातर राजदीप सरदेसाईला १५ दिवस त्यांच्या वाहिनीवरून बाजूला करावे लागले हेते. तेव्हा त्यानेच स्वीकारले की, आम्ही जे ‘गोल्डन स्टँडर्ड’ करतो, ते सर्व बेगडी सोने आहे; कारण आमच्याकडे राजदीपसारखे एकाहून एक नामचीन खोटारडे बसले आहेत. असे खोटे पसरवत रहायचे आणि भाजप, रा.स्व. संघ, हिंदुत्वनिष्ठ यांना लक्ष्य करत रहायचे अन् त्यांच्याविषयी वाटेल ते खोटे पसरवत रहायचे.

५. आधी जाणीवपूर्वक खोटे आरोप करून नंतर सारवासारव करणारे पुरोगामी संपादक !

वर्ष २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजदीप पंतप्रधान मोदींच्या रथात घुसला. तेव्हा त्यांनी त्याला पायाशी बसवले. तो बेशरम माणूस त्यांच्या पायाशी बसूनही त्यांची मुलाखत घेत होता. किती हा निर्लज्जपणाचा कळस ? माणूस किती कोडगा आणि निर्ढावलेला असतो, याचा नमुना म्हणून आपण राजदीपकडे बघू शकतो आणि तो परत सर्वांना ‘नम्रतेने बोला’ बेशरमपणे सांगतो ! तसाच पहा सिद्धार्थ वरदराजन आहे. वरदराजन याने कुठल्या तरी खोट्या ई-मेल चे‘स्क्रीन शॉट’ घेतले आणि भाजपचे प्रवक्ते अन् ‘आयटी सेल’ प्रमुख अमित मालवीय हा विविध ‘सोशल मिडिया’च्या आस्थापनांवर दबाव आणून त्यांना भाजपच्या विरोधातील लोकांचे खाते कसे बंद करायला लावतो, याची ‘स्टोरी’ (कथानक) केली. जेव्हा यातील खोटेपणा समोर यायला लागला, तेव्हा ‘आम्ही खरे लिहिले आहे, खोटे लिहिले नाही’, असे सिद्धार्थ वरदराजन सांगत होता. जेव्हा अमित मालवीय याने त्याला न्यायालयात खेचण्याची चेतावणी दिली, तेव्हा वरदराजन याने सर्व लिखाण गुपचूप नष्ट (डिलीट) केले आणि माफी मागितली. अशा पद्धतीने आधी खोटे सांगून नंतर माफी मागण्यात सिद्धार्थ वरदराजन हा अत्यंत पारंगत आहे. तो संपादक; पण बदमाश आहे.

६. बुद्धीमंत त्यांच्या बुद्धीचा वापर गुन्हेगारीसाठी करत असल्याने समाजात गुन्हेगारीला प्रतिष्ठा प्राप्त होणे

सिद्धार्थ वरदराजन हा बदमाश आहे, म्हणजे काय आहे ?  मला आठवते की, फार पूर्वी दिलीप कुमार आणि अनिल कपूर यांचा ‘मशाल’ नावाचा चित्रपट आला होता. त्यात दिलीप कुमार हा पत्रकार संपादक असतो. एक माफीया अमरीश पुरी त्याची नोकरी घालवतो. दिलीप कुमार एक लहानसे वर्तमानपत्र चालू करतो. तेव्हा त्याच्या कार्यालयात जाऊन अमरीश पुरी त्याची खिल्ली उडवतो. त्या वेळी दिलीप कुमार याने अमरीश पुरीला जे शब्द ऐकवले, ते फार महत्त्वाचे आहेत. दिलीप कुमार म्हणतो, ‘‘अरे, तू बोलून चालून एक गुंड आणि निर्बुद्ध आहेस. लक्षात ठेव, ज्या दिवशी माझ्यासारखे बुद्धीमान लोक बदमाशी करणे चालू करतील, त्या दिवशी तुझी खैर नाही; कारण तू निर्बुद्ध आहेस आणि मी बुद्धीमान आहे. मी बदमाश झालो, तर तुला पळता भुई थोडी होईल.’’ सिद्धार्थ वरदराजन किंवा राजदीप सरदेसाई यांनी दिलीप कुमारच्या ‘मशाल’ या चित्रपटातील हे शब्द खरे करून दाखवले आहेत; कारण हे खरोखरच बुद्धीमान आहेत. ते जेव्हा त्यांची बुद्धी गुन्हेगारीसाठी वापरतात, तेव्हा समाजामध्ये गुन्हेगारी प्रतिष्ठित होत असते. जेव्हा सिद्धार्थ वरदराजन किंवा राजदीप सरदेसाई अशी माणसे बुद्धीजीवी, संपादक, पत्रकार आणि विश्लेषक बनून प्रतिष्ठित व्हायला लागतात, तेव्हा समाजात गुन्हेगारी आपोआपच वाढत जाते; कारण गुन्हेगारी अन् बदमाशी यांना प्रतिष्ठा मिळत असते.

७. सुशील कुलकर्णी आणि अश्विन अघोर यांनी ‘यू ट्यूब’च्या माध्यमातून ‘द वायर’ अन् त्याचे संपादक यांचा खोटारडेपणा समोर आणणे

सांगायचा हेतू असा की, आज सुशील कुलकर्णी आणि अश्विन अघोर यांनी ‘द वायर’चे वाभाडे काढले. त्याचप्रमाणे अग्रलेख मागे घेतल्यावरून कुबेर यांचेही वाभाडे काढले. अरे, एक बुद्धीजीवी जेव्हा अग्रलेख लिहितो, तेव्हा त्याने हा अग्रलेख विचार न करता लिहिला होता का ? आधी संघाची टवळी करायची आणि नंतर तो मागे घ्यायचा. ‘द वायर’मध्ये तेलंगाणाची खोटी बातमी देण्यात आली. त्यात ‘तेलंगाणाच्या बातमीला कर्नाटकात आमदारांची फोडाफोडी चालली आहे’, असे शिर्षकात लिहिले. त्यांनी सिद्धार्थ वरदराजन आणि ‘द वायर’चा हा धडधडीत खोटेपणाही समोर आणला.

भाजपचे नेते अमित शहा यांचा पुत्र जय शहा यांचे एक आस्थापन आहे. ‘जय शहा याने ५० लाखाच्या भांडवलात १ सहस्र ६०० कोटी रुपयांची उलाढाल करून इतके पैसे मिळवले’, असा खोटानाटा आरोप ‘द वायर’ने सिद्धार्थ वरदराजनच्या पोर्टलवर लिहिला होता. ‘५० लाखाचे आस्थापन १ सहस्र ६०० कोटी रुपयांची उलाढाल कशी करते ? म्हणजे काळ्याचे पांढरे करण्यात आले’, असे विविध खोटेनाटे बेछूट आरोप करण्यात आले. शेवटी जय शहा याने याविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला प्रविष्ट केला. तेव्हा वरदराजन याने शेपूट घातले. ‘म्हणे, आम्ही सत्य शोधण्याचा प्रयत्न केला.’ मग सत्य सापडले का ? सत्य शोधायला जाऊन तुम्हाला नेमके खोटे कसे सापडते ? याचे उत्तर सिद्धार्थ वरदराजन असो किंवा त्याच्यासारखे पुरोगामी लोक कधीही देणार नाहीत.

८. ‘खोटारडेपणा म्हणजे पुरोगामी’, अशी प्रतिमा निर्माण होणे

आता ‘खोटारडेपणा म्हणजे पुरोगामी’, अशी प्रतिमा झाली आहे. ‘पुरोगामी’ हा शब्द फार चांगला आहे. मी पुरोगामी चळवळीतून आलो आहे; पण तेव्हाचे आणि आताचे पुरोगामी यांच्यात ‘जमीन-आस्मान’चा फरक आहे. तेव्हा सत्शील लोक पुरोगामी होती, आता केवळ बदमाश लोक पुरोगामी असतात. दुर्दैवाने ही वस्तूस्थिती आहे. सिद्धार्थ वरदराजन हा त्यापैकीच एक पुरोगामी पत्रकार आहे. नीरा राडीया प्रकरणात प्रभु चावला, बरखा दत्त सापडले होते ना ? माणसे किती बदमाश असतात आणि परत कसे प्रतिष्ठित म्हणून मिरवतात, याचे हे उदाहरण आहे. यानिमित्ताने सिद्धार्थ वरदराजन याचा बदमाशपणा मुद्दाम सांगणार आहे. त्यांना सत्य शोधायचे नसते, तर जेव्हा सत्य समोर असते, तेव्हा त्याला खोटे कसे ठरवायचे, यासाठी संशोधन चालू होते. लातूर येथील भाजपच्या नेत्यांनी विलासराव देशमुखांचे पुत्र अन् अभिनेते रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी यांच्या आस्थापनाला  ‘एम्.आय.डी.सी.’चा भूखंड आणि कर्ज कसे पटापट मिळाले, याविषयीचे पुरावे पत्रकार परिषद घेऊन दिले. त्यानंतर मधल्या मध्ये अडकून पडलेले ‘एबीपी माझा’चे राहुल कुलकर्णी सतत ३ दिवस पुरावे तपासत बसले; पण बातमी दिली नाही. जेव्हा त्या बातमीचा सगळीकडे गवगवा झाला, तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी त्या बातमीतील तथ्य तपासत होतो !’’ उरलेल्या वेळेला तुम्ही किती तथ्य तपासता ?

९. पैशासाठी एका पक्षाच्या विरोधात दुसर्‍या पक्षाची मानहानी करण्यासाठी पत्रकारांच्या टोळ्या निर्माण होणे

सांगायचे सूत्र असे की, हे सिद्धार्थ वरदराजन एकेकाळी दक्षिणेतील ‘द हिंदू’ या डाव्या विचारसरणीच्या मोठ्या वर्तमानपत्राचे संपादक होते. त्या वेळी एका महिला शोध पत्रकाराने  प्रियांका वडेराचे पती रॉबर्ट आणि ‘डी.एल्.एफ्.’ आस्थापन यांचा भूमी घोटाळा शोधून काढला होता. त्यावर या पत्रकाराने सर्व कागदपत्रे आणि तपशील एकत्र करून एक प्रदीर्घ लेख लिहून तो ‘द हिंदू’कडे पाठवला होता. तेव्हा तो लेख ३-४ मास या सिद्धार्थ वरदराजनने दडपून ठेवला होता. एवढे सर्व सत्य ३-४ मास दाबून ठेवले होते; कारण ते सोनिया गांधी यांच्या जावयाचे अन् प्रियांका वडेरा यांच्या नवर्‍याचे प्रकरण होते. तसेच हा कोट्यवधीचा घोटाळा होता. यासंदर्भात सिद्धार्थ वरदराजन काहीही करायला सिद्ध नव्हते, तेव्हा सर्वाेच्च न्यायालयाचे मोठे अधिवक्ते प्रशांत भूषण आणि केजरीवाल यांनी मिळून एक पत्रकार परिषद घेतली अन् रॉबर्ट वडेराच्या त्या प्रकरणाचा संपूर्ण पर्दाफार्श केला. हे पाहून त्या दिवशी घाईगर्दीने सिद्धार्थ वरदराजन याने तेच प्रकरण ‘द हिंदू’ मध्ये छापले. याला ‘पुरोगामित्व’ म्हणतात. जेथे सत्य दाबले जाते आणि खोट्याला झळाळी करून दाखवले जाते, त्याला ‘पुरोगामित्व’ म्हणतात; कारण हे लोक आता कोडगे झाले आहेत. आम्ही टीका करतो, अनेक लोक लाथा मारत आहेत, लोकांनी वर्तमानपत्र वाचणे बंद केले आहेत. डबघाईला जाऊन माध्यमे संपलेली आहेत, तेव्हा सत्ताधारी किंवा कुठल्या तरी पक्षाच्या सुपार्‍या घ्यायच्या आणि एका पक्षाच्या विरोधात दुसर्‍या पक्षाची मानहानी करण्यासाठी या पत्रकारांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. गुंडापेक्षाही गुंड !

असो या कोडग्यांना काही लाज नाही, हे सांगणे आवश्यक होते. गेल्या १५ ते २० वर्षांमध्ये ‘पुरोगामी म्हणजे बदमाश !’, हे प्रस्थापित करण्याची एक बुद्धीजीवी परंपरा. ‘बुद्धीजीवी आणि पुरोगामी याचा अर्थ १०० टक्के  बदमाशी’, हे या लोकांनी सिद्ध केले आहे. त्यामुळेच मी म्हणतो की, त्यांना आता लाथा मारूनही उपयोग नाही; कारण ‘कोडग्यांना लाज नसते आणि कालचे बोलणे आज नसते.’                              (ऑक्टोबर २०२२)

– श्री. भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक

(साभार : ‘प्रतिपक्ष’ यू ट्यूब ​चॅनल​ )                             (समाप्त)