अबू आझमीसारख्या माणसाला महाराष्ट्राच्या बाहेर फेकले पाहिजे ! – छत्रपती संभाजीराजे भोसले, भाजप

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलशाहीला केवळ महाराष्ट्रातूनच नाही, तर संपूर्ण देशातून बाहेर काढण्याचे ठरवले होते. असे असतांना अबू आझमीसारखी माणसे महाराष्ट्रात रहातात, हे दुर्दैव आहे. अबू आझमी महाराष्ट्रात का रहातो आहे ? असल्या माणसाला प्रथम महाराष्ट्राच्या बाहेर फेकले पाहिजे, अशा प्रकारे भाजपचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी अबू आझमी यांच्याविषयी संताप व्यक्त केला.

अबू आझमी यांनी ‘औरंगजेब वाईट राजा नव्हते. त्यांचा खरा इतिहास लोकांसमोर आणला, तर कोणतीही हिंदु व्यक्ती असंतोष व्यक्त करणार नाही’, असे विधान केले होते. यावर लोणावळा येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना संभाजीराजे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

छत्रपती संभाजीराजे भोसले पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील नागरिकांनी अबू आझमीला सांगायला हवे की, तुला जर महाराष्ट्रात रहायचे असेल, तर तू छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर आणि सर्व संत यांची नावे घेतली पाहिजेत. काय त्या औरंगजेबाचे नाव घेतोस ? असे बोलायचे याचे धारिष्ट्य कसे होते ?’’