(म्हणे) ‘वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा नवऱ्याच्या नावाचे झाड लावा !’ – अभिनेत्री हेमांगी कवी यांचे विधान

अभिनेत्री हेमांगी कवी

मुंबई – वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा नवऱ्याच्या नावाचे झाड प्रत्येक वर्षी लावले, तर कदाचित केवळ त्याचेच नाही, तर आपलेही आयुष्य वाढेल, असे अज्ञानमूलक वक्तव्य अभिनेत्री हेमांगी कवी हिने केले. वटपौर्णिमेनिमित्त एका ‘पोस्ट’द्वारे त्यांनी हे विधान केले.

या पोस्टमध्ये हेमांगी कवी म्हणाल्या,

१. साता जन्माच्या गोष्टी ! नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा त्याच्या नाकी नऊ न आणणे हे अधिक महत्त्वाचे आणि फलदायी व्रत आहे, कुठल्याही बायकोसाठी ! वडाची फांदी तोडून घरी आणून पुजण्यापेक्षा नवऱ्याच्या नावाचे झाड लावावे. यात मला कुणाच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत.

२. उपवास करायची ज्याची त्याची इच्छा आणि श्रद्धा ! तरीही त्यातून ‘मॅडम तुम्ही उपास धरला का ?, असे विचारणाऱ्यांना वाळलेला फणस मिळो. (एकीकडे धार्मिक गोष्टींवर टीका करायची, उपवासाविषयीही विनोद करून धार्मिक भावना हेतूपुरस्सर दुखवायच्या आणि दुसरीकडे ‘मला कुणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत’, असे साळसूदपणे म्हणायचे, हे समजण्याइतके हिंदू दूधखुळे नव्हेत ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच हिंदु धर्माचे खरे वैरी ! अशा जन्महिंदूंनी आपले धार्मिक सण, व्रते यांविषयीचे शास्त्र समजून न घेता काहीही बरळणे, ही सध्या ‘स्टंटबाजी’ झाली आहे. सवंग प्रसिद्धीसाठी अशी मुक्ताफळे उधळणाऱ्यांना हिंदूंनी वेळीच संघटितपणे खडसावल्यास अशा गोष्टींना आळा बसेल !
  • अध्यात्मशास्त्राचा अभ्यास नसतांना सण व व्रते यांविषयी बेताल वक्तव्य करणे म्हणजे समाजाची दिशाभूल करणे !