सामाजिक ऐक्यासाठी कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव समजून घेतले पाहिजे ! – श्रीमंत राजे मुधोजी भोसले

‘१ जानेवारी, १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’ या पुस्तकाचा पुणे येथे पार पडला प्रकाशन सोहळा !

‘१ जानेवारी, १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’ या पुस्तकाचे प्रकाशन करतांना १. अधिवक्ता रोहन जमादार २. श्रीमंत राजे मुधोजी भोसले आणि अन्य मान्यवर

पुणे – यूट्यूब आणि सामाजिक प्रसारमाध्यमे यांवरून उपलब्ध होणारी माहिती परिपूर्ण नसते. लेखकाने पुराव्यानिशी कोरेगाव भीमा लढाईची माहिती पुस्तकात दिलेली आहे; म्हणूनच मी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यास होकार दिला. सामाजिक ऐक्यासाठी या लढाईचे वास्तव आपण समजून घेणे आवश्यक आहे. इतिहासाचा सखोल अभ्यास करून सत्य समोर आणणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण मूळ संदर्भांचे वाचन केले पाहिजे. नागपूरचे श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते ‘१ जानेवारी, १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’ या पुस्तकाचे प्रकाशन १८ जानेवारी या दिवशी पुण्यात पार पडले, त्या वेळी ते बोलत होते. पुस्तकाचे लेखक अधिवक्ता रोहन जमादार (माळवदकर) हे कोरेगाव भीमा लढाईतील इंग्रजांकडील सैनिक आणि जयस्तंभाचे ‘इन्चार्ज’ जमादार खंडोजी माळवदकर यांचे सातवे वंशज आहेत.

राजे मुधोजी भोसले पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना समान मानून, समवेत घेऊन मोठे कार्य केले. तोच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण जगले पाहिजे. इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’ तत्त्वाचा अवलंब केला. आपण समाजात फूट पडू द्यायची नाही. त्यासाठी आपल्या राज्यघटनेतील तत्त्वांचा अभ्यास, प्रचार केला पाहिजे.

या वेळी सेवानिवृत्त भारतीय लष्करी अधिकारी कॅप्टन बाळासाहेब जमादार माळवदकर उपस्थित होते. अधिवक्ता शिवाजीराव कोकणे, मोडी कागदपत्र अभ्यासक संदीप शिवले यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. सौरभ वीरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मूळ ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास केल्यास ही जातीअंताची लढाई नव्हती, हे समजते ! – रोहन जमादार, लेखक

समकालीन संदर्भ पुराव्यांसह कोरेगाव भीमा लढाईचा सत्य इतिहास पुस्तकात दिलेला आहे. इंग्रज आणि मराठा सैन्यात तिसर्‍या युद्धातील एक अनिर्णायक लढाई कोरेगाव भीमा येथे झाली. या लढाईत दोन्ही सैन्यात विविध जाती-धर्माचे सैनिक होते. खुद्द छत्रपती प्रतापसिंह महाराज हे लढाईच्या वेळी दुसरे बाजीराव पेशवे यांसह फौजेत होते. या लढाईच्या इतिहासाला धरून काही लोक सोयीस्कर आणि संदर्भहीन मांडणी करतात. मूळ ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास केल्यास ही जातीअंताची लढाई नव्हती, हे समजते.

अधिवक्ता रोहन जमादार

या लढाईच्या स्मरणार्थ इंग्रजांनी जयस्तंभ उभा केला. माझे पूर्वज खंडोजी जमादार यांना इंग्रजांनी जयस्तंभाचे ‘इन्चार्ज’ नेमले. जयस्तंभावर इंग्रजांनी कोरलेली माहिती वाचली तरी कोरेगाव भीमाची लढाई कोणत्याही विशिष्ट जातीशी जोडता येत नाही, हे लक्षात येते. इंग्रजांनी तत्कालीन अस्पृश्य बांधवांना आपल्या सैन्यात प्रवेश बंदी केली. इंग्रजांच्या या जातीयवादी धोरणाविरुद्ध बंड पुकारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १ जानेवारी १९२७ या दिवशी जयस्तंभाला भेट दिली होती.