मराठी पत्रकारितेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा बाणेदारपणा जोपासण्याचे सामर्थ्य ! – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई – आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी बाणेदार आणि निर्भीड पत्रकारितेचे बाळकडू दिले आहे. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीतही हा वसा आणि वारसा जतनाचे सामर्थ्य मराठी पत्रकारितेत निश्चित आहे, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ६ जानेवारी या दिवशी पत्रकारदिनाच्या निमित्ताने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करतांना त्यांनी वरील विधान केले. पत्रकारदिनाच्या निमित्ताने त्यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

उद्धव ठाकरे

या वेळी उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वत:च्या विद्वत्तेच्या बळावर परकीय राजवटीत मराठी पत्रकारितेचा पाया घातला. स्वत:च्या लेखनातून ब्रिटिशांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा बाणेदारपणा दाखवला. सद्यस्थितीत पर्यावरणातील पालट आणि मानव अन् अन्य जीवसृष्टी यांचे आरोग्य, त्यांचे अस्तित्व आदी आव्हाने उभी रहात आहेत. ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या क्षेत्रापुढे अनेक आव्हाने असली, तरी पत्रकारितेच्या मूल्यांना कुणीही धक्का लावू शकत नाही’, असा धडा आचार्य बाळशास्त्री यांनी त्यांच्या कर्तृत्वातून घालून दिला आहे. त्यांचा बाणेदारपणा जागवणे, हेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन आहे.