आपत्काळ हे काळानुसार येणारे तात्कालिक संक्रमण आहे. सनातनच्या साधकांना परात्पर गुरुदेवांनी दिलेले मोक्षप्राप्तीचे ध्येय हेच चिरंतन आहे ! त्या ध्येयातील वाटचालीत येणारे आपत्काळासम अनेक अडथळे गुरुदेवांच्या कृपेने लीलया मागे पडतील ! गुरुदेवांनी दर्शवलेल्या आनंदप्राप्तीच्या साधनापथावर निष्ठेने मार्गक्रमण करत रहाण्यासाठी साधकांना प्रेरणा देणारे हे काव्य !
सदैव साधका पुढेच जायचे ।
न मागुती तुवा कधी फिरायचे ॥ धृ ॥
तू न केवळ तारक उपासक ।
तू धर्मवीर हो, जे रूप मारक ।
शूर तू खरा अखंड लढायचे ।
सदैव साधका पुढेच जायचे ॥ १ ॥
झडे देहबुद्धी वासना अहं ।
लये मन-बुद्धी जागवे सोऽहम् ।
गुर्वाज्ञा ती आता पाळीत जायचे ।
सदैव साधका पुढेच जायचे ॥ २ ॥
काळ धावतो अमूल्य जो तुला ।
उपयोगी क्षणक्षण कर तू साधना ।
भान काळाचे सदा राखायचे ।
सदैव साधका पुढेच जायचे ॥ ३ ॥
ढाल गुरुकृपा श्रद्धा अंतरी ।
भीती ना मनी आनंद अंतरी ।
साधना म्हणून कार्य करायचे ।
सदैव साधका पुढेच जायचे ॥ ४ ॥
– एका साधिकेला स्फुरलेले प्रेरणादायी काव्य
साधकांसाठी परात्पर गुरु डॉक्टरांचे आश्वासक बोल !
‘आपत्काळ येण्यापूर्वी अनेक संत देहत्याग करतील. मी मात्र तुम्हा साधकांसमवेत शेवटपर्यंत, म्हणजे संपत्काळ येईपर्यंत (हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत) असेन.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले