हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जाती-पाती विसरून एक व्हा ! – महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ प.पू. श्री महंत भैयाजी महाराज

महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ प.पू. श्री महंत भैयाजी महाराज

हरिद्वार, १८ एप्रिल (वार्ता.) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जाती-पाती विसरून एक व्हावे लागेल. सर्वांची विचारधारा एक व्हायला हवी. काही स्वार्थी लोकप्रतिनिधींनी स्वार्थासाठी हिंदूंना जातींमध्ये विभक्त केले. त्यामुळे हिंदू ‘हिंदु’ राहिला नाही. हिंदु शब्दाची व्याख्या जातींवरून केली गेली. आपली एकच जात हवी, एकच ओळख हवी. सर्व हिंदू स्वतःची ओळख ‘हिंदु’ म्हणून करून देतील, तेव्हा सर्वांची एकच ओळख निर्माण होईल. हे जेव्हा आपण स्वतःमध्ये रूजवू, तेव्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आवश्यकता पडणार नाही, असे प्रतिपादन वल्लभगढ (हरियाणा) येथील अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अणि आखाड्याचे महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ प.पू. श्री महंत भैयाजी महाराज यांनी केले.

येथील कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. समितीचे श्री. श्रीराम काणे यांनी त्यांना केंद्राची माहिती देऊन त्यांचा सन्मान केला. या वेळी समितीचे श्री. सुनील घनवट हेही उपस्थित होते.

सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्राविषयी काढलेले कौतुकोद्गार !

महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ प.पू. श्री महंत भैयाजी महाराज सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्राचे कौतुक करतांना म्हणाले, ‘‘तुम्ही (सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती) करत असलेले कार्य केवळ उत्तम नाही, तर अतीउत्तम आहे. तुम्ही स्वतः न्यूनपणा घेऊन दुसर्‍यांना सन्मान देता. लहान बनून दुसर्‍यांना सन्मान देणे, ही हिंदु संस्कृती आहे. हिंदूंना जागृत करण्यासाठी जे प्रयत्न करत आहात, ते अतीउत्तम आहेत.’’